NCP च्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार का?:सुनील तटकरे म्हणाले – आम्ही उत्सुक नाही, पण परिस्थिती उद्भवली तर निर्णय घेतला जाईल




उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाविषयी एक सूचक विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणी उत्सुक नाही, पण तशी एखादी परिस्थिती उद्भवली तर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी एनडीए सोबत असल्याची बाबही आवर्जून निदर्शनास आणून दिली. राज्यातील महापालिका निवडणुकीत शरद पवार व अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची अत्यंत सुमार कामगिरी झाली. अनेक ठिकाणी या पक्षांना मानहाणीकारक पराभव पत्करावा लागला. यामुळे या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी गुरुवारी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना उपरोक्त विधान केले आहे. ते म्हणाले, मी याविषयी फार काही बोलू शकत नाही. कारण, विलीनीकरण हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. आम्ही भाजपप्रणित एनडीएचा भाग आहोत हे या प्रकरणी प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) विलीनीकरणासाठी उत्सुक नाही. पण तशी एखादी परिस्थिती उद्भवली, तर योग्य तो निर्णय घेतला जाईल. पण आम्ही महाराष्ट्रात महायुतीत व राष्ट्रीय पातळीवर एनडीएचे भाग आहोत व पुढेही राहू हे मी या प्रकरणी स्पष्ट करतो. यापुढेही युतीचे महापालिका सूत्र वापरले जाणार सुनील तटकरेंनी यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढण्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, जिथे शक्य असेल तिथे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढतील. पण जिथे आघाडी शक्य नसेल, तिथे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढतील. महापालिका निवडणुकीत आम्ही जे सूत्र वापरले, तेच सूत्र इथून पुढेही वापरले जाईल. अजित पवारांनी यासंबंधीची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. पण आम्ही एकत्र निवडणूक लढवली, तर आम्हाला एकाच चिन्हावर लढावे लागेल. एकत्र लढल्यास तुतारी किंवा घड्याळ या दोन्हीपैकी एका चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते, असे तटकरे म्हणाले. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पराभव का झाला? राष्ट्रवादीच्या शरद व अजित पवार गटाने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत युती केली होती. पण त्यानंतरही त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या घटनाक्रमावर भाष्य करताना तटकरे म्हणाले, आम्ही अजूनही निकालाचे विश्लेषण करत आहोत. कुठे चूक झाले हे कळल्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. प्रत्येक महापालिका निवडणुकीचे समीकरण वेगळे असते. आम्ही जनमताचा आदर करतो. सध्या आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करत आहोत. आता निवडणुकीतील आरोप प्रत्यारोपाचा विषय संपला आहे. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होतच राहतात, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *