![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून १८ जुलै रोजी नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे रामरक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण करणार असून, यावर मंत्री मंगळप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. रामरक्षा पठण करणे स्वागतार्ह असले तरी एका घटनेच्या आधारे प्रभू रामांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘उशिरा का होईना, प्रभू रामांवर श्रद्धा निर्माण झाली’ मंगळप्रभात लोढा म्हणाले, “उद्धव ठाकरे रामरक्षा स्तोत्राचे पठण करणार आहेत, ही चांगली बाब आहे. उशिरा का होईना, त्यांना प्रभू श्रीरामांविषयी श्रद्धा निर्माण झाली, याचा आनंद आहे. मात्र, एखाद्या घटनेचा आधार घेत प्रभू रामांची किंवा राम मंदिराची बदनामी करणे योग्य नाही.” एसआयटी चौकशी सुरू असल्याचा दावा राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत बोलताना लोढा यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, अशी भूमिका सरकारने वारंवार स्पष्ट केली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राजकारण करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. राम मंदिराच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘रामरक्षा’ आंदोलन सुरू केले आहे. यासाठी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही पत्र लिहून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यापूर्वी मंगळप्रभात लोढा यांच्या प्रतिक्रियेमुळे हा राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकाराचे लोढांकडून कौतुक राज्यातील दुर्गम गावे आणि तालुका स्तरापर्यंत डिजिटल कायदेविषयक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सरकार पावले उचलत असल्याची माहितीही मंगळप्रभात लोढा यांनी दिली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी या सेवा ग्रामीण भागापर्यंत विस्तारण्याची इच्छा व्यक्त केली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उद्दिष्टासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे लोढा म्हणाले. नागरिकांना न्यायव्यवस्थेशी अधिक सुलभ आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. ‘हिंदूंच्या श्रद्धेला तडा गेलाय, त्यांना ऊर्जा देण्याची गरज’:मोहन भागवतांना रामरक्षा आंदोनाचे निमंत्रण देत राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘रामरक्षा’ ही राज्यव्यापी चळवळ उभी केली आहे. या उपक्रमांतर्गत १८ जुलै २०२६ रोजी नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार संजय राऊत यांनी काल (१५ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे दिले होते. त्यानंतर आता राऊत यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनाही पत्र लिहून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे ‘विशेष निमंत्रण’ दिले आहे. या पत्रातून राऊतांनी राम मंदिरातील चोरीवरून भाजप आणि प्रशासनावर सडकून टीका केली असून, संघालाही सूचक टोला लगावला आहे. सविस्तर वाचा
दोषींवर कारवाई सुरूच आहे, पण राजकारण नको:राम मंदिर चोरी प्रकरणावर मंगलप्रभात लोढांचे ठाकरे गटाला उत्तर
