![]()
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर पराभवाचे सावट आहे. भाजपचे नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी ‘उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्री राम’ अशा मोजक्या शब्दांत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यांचा यासंबंधीचा उपरोधिकि हास्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. राज्यात गुरुवारी मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी पार पडली. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत भाजपने मुंबईसह बहुतांश मनपांवर आघाडी घेत विरोधकांचा धु्व्वा उडवला आहे. लातूर, चंद्रपूर आदी निवडक ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली आहे. विशेषतः मुंबईत विजयाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ठाकरे बंधूंची पडझड झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, 227 सदस्यीय मुंबई महापालिकेत भाजप व महायुतीने स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर ठाकरे बंधूंचा वारू 70 जागांच्या आसपास उधळत आहे. नीतेश राणेंनी हसण्याचा व्हिडिओ केला पोस्ट या पार्श्वभूमीवर नीतेश राणे एक व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. नीतेश राणे आपल्या व्हिडिओत उपरोधिकपणे हसताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अगदी मोजक्या शब्दांत उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम, असे ते म्हणालेत. त्यानंतर पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी ठाकरेंवर टीका केली. निवडणुकीतून जिहादींना कडक संदेश मिळाला ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना माझा हसरा चेहरा पाठवा. उद्धव, आदित्य ठाकरे व त्यांच्या सगळ्यांना माझा जय श्रीराम. आज आमचा भगवा झंजावात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दिसून आला. राज्यातील बहुतांश महापालिकांत जय श्रीरामचा महापौर बसवण्याची तयारी झाली आहे. मी मतदारांचे आभार मानतो. त्यांनी या सगळ्या महापालिकांवर जय श्रीराम व आय लव्ह महादेव यांच्या विचारांचे महापौर बसवले. यामुळे महाराष्ट्र व देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या जिहादींना कडक संदेश मिळाला आहे. ठाकरे बंधूंनी इस्लामाबादचे विमान पकडण्याचा सल्ला नीतेश राणे यांनी यावेळी ठाकरे बंधूंना पाकिस्तानात जाऊन अल्लाह हू अकबर म्हणण्याचाही खोचक सल्ला दिला. मुंबईतील पराभवानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र बसावे. संध्याकाळी इस्लामाबादची फ्लाईट आहे. त्यांनी फ्लाईटमध्ये बसून पाकिस्तानला जावे. तिथे अल्लाह हू अकबर म्हणावे, असे ते म्हणाले. दुसरीकडे, सुषमा अंधारे यांनी नीतेश राणे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तुझी चूक नाही टिल्लू. बाप आयुष्यभर घोटाळे करण्यात आणि पदासाठी कधी ठाकरे, कधी सोनिया गांधी, फडणवीस यांच्या चरणी लीन होण्यात आयुष्य खर्ची घालत असेल तर पोरगं लायकी दाखवणारच, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, नीतेश राणे यांच्या या टीकेमुळे ठाकरे व भाजपतील वाद एका नव्या टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे.
उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्री राम:नीतेश राणे यांची ठाकरे गटावर जहरी टीका; सुषमा अंधारे यांचा 'टिल्लू' म्हणत जोरदार पलटवार
