![]()
महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. सकाळीच मतदान केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी जबाबदारी पार पाडली. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरपालिकेच्या निवडणुकांना लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याचे स्पष्ट केले. नगरपालिका ही लोकशाहीची मूलभूत रचना आहे. हीच लोकशाहीची खरी पायाभरणी मानली पाहिजे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नगरपालिकांमधूनच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सुटतात. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत दिल्या जातात. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे. मतदान करणे हे केवळ अधिकार नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मी स्वतः मतदान करून या कर्तव्याची पूर्तता केली आहे, असे सांगत त्यांनी राज्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. भूषण शिंगणे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध मतदानानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी सांगितले की, या हल्ल्यात भूषण शिंगणे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे, पायाला आणि डोक्यालाही दुखापत झाली आहे. हा हल्ला अत्यंत गंभीर असून, हा थेट लोकशाहीवरचा हल्ला आहे, असे म्हणत त्यांनी या घटनेला दुर्दैवी आणि निंदनीय ठरवले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या हल्ल्यासाठी थेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला. जेव्हा निवडणुकीत विजय मिळवता येत नाही, तेव्हा अशा प्रकारची हिंसा केली जाते. ही कृती म्हणजे लोकशाहीवर काळी छाया टाकण्यासारखी आहे, अशी कठोर टीका त्यांनी केली. राजकीय मतभेद असले तरी निवडणुकीच्या प्रक्रियेत हिंसेला कोणतेही स्थान नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे लोकशाही मूल्यांना धक्का बसतो, असेही ते म्हणाले. हिंसक कृत्यांना जनता योग्य उत्तर देईल या संपूर्ण प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, अशा हिंसक कृत्यांना जनता योग्य उत्तर देईल. लोकशाहीत अंतिम निर्णय जनता देते. अशा प्रकारच्या हल्ल्यांचा योग्य तो निकाल जनता मतदानातून देईल, असे म्हणत त्यांनी शांतता, संयम आणि लोकशाही मार्गानेच राजकारण व्हावे, यावर भर दिला. एकीकडे मतदानाचा उत्सव सुरू असताना, दुसरीकडे अशा घटनांमुळे वातावरण बिघडू नये, यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले. मार्कर, PADU मशीन आणि आरोपांच्या फैरी यावेळी बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईऐवजी मार्कर वापरण्यात येत असल्याबाबत आणि ती सहज पुसली जात असल्याच्या आरोपांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट निवडणूक आयोगाकडे बोट दाखवत, या सर्व बाबी आयोगाच्या अखत्यारित येतात, असे सांगितले. फडणवीस म्हणाले की, मतदान प्रक्रियेशी संबंधित नियम, साहित्य आणि पद्धती ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे निवडणूक आयोगाचा आहे. यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये मार्कर पेनचा वापर करण्यात आला असून, ही काही नवीन बाब नाही. तथापि, जर कोणाला याबाबत काही आक्षेप असतील, तर निवडणूक आयोगाने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, असे सांगत त्यांनी आयोगावर जबाबदारी टाकली. निकाल आल्यानंतर दोष कुणावर ढकलायचा याचा आराखडा काही लोक उद्याच्या निकालाची आधीच मानसिक तयारी करत असून, निकाल आल्यानंतर दोष कुणावर ढकलायचा याचा आराखडा आत्ताच तयार केला जात आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे, असा टोला त्यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून यंदाच्या निवडणुकांसाठी बोटावर शाई लावण्याऐवजी मार्करचे किट उपलब्ध करून देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून, हा मार्कर 2012 सालापासून विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरण्यात येत आहे. त्यामुळे यंदाचा वापर अपवादात्मक नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. मात्र, मतदानाच्या दिवशी मार्करची निशाणी पुसली जात असल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने या निर्णयावर संशयाची छाया निर्माण झाली आहे.
मार्कर, PADU आणि संशय; मतदानानंतर देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना थेट टोला:भूषण शिंगणे यांच्यावरील हल्ल्यावर कठोर टीका
