भाजपकडून दहिसरमध्ये 'मिक्सर' वाटप!:काँग्रेसने जाब विचारताच पोलिसांनी घेतले ताब्यात, पोलिस ठाण्यात हायव्हॉल्टेज ड्रामा; पाहा VIDEO




महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना दहिसरच्या शांतीनगर जनकल्याण (वॉर्ड क्र. 3) परिसरात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून मतदारांना छुप्या पद्धतीने ‘मिक्सर’ वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला असून, या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगर जनकल्याण भागात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांना प्रलोभन म्हणून मिक्सरचे वाटप केले जात असल्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाली होती. या कथित प्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार प्रदीप चौबे, मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अखिलेश यादव आणि मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विकास पांडे हे आपल्या समर्थकांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या वाटपावर आक्षेप घेत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आचारसंहिता भंगाचा आरोप असलेल्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार प्रदीप चौबे, अखिलेश यादव आणि विकास पांडे यांनाच ताब्यात घेतले. पोलिसांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. अखिलेश यादव यांनी भाजप आणि पोलिस प्रशासनावर सडकून टीका केली. ते म्हणाले, भाजपचे पितळ उघडे पडल्यामुळेच सत्तेचा गैरवापर करून काँग्रेस कार्यकर्त्यांचा पोलिसांकडून छळ केला जात आहे. ‘चोर सोडून संन्यासाला फाशी’ देण्यासारखी कृती असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपकडून अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीची हत्या केली जात असल्याची घणाघाती टीकाही यादव यांनी यावेळी केली. मिक्सर वाटपचा व्हिडिओ मतदानाच्या अवघ्या काही तास आधी घडलेल्या या घटनेमुळे दहिसरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *