अमित ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर प्रश्नांचा भडिमार:महागाई, प्रदूषण आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना घेरले




महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असून आता अवघे काही तास मतदानासाठी बाकी आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी एक व्हिडओ शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत हल्लाबोल केला आहे. अमित ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा, प्रदूषण आणि राजकारणात झालेला विकृतपणा यावरून हल्लाबोल केला आहे. तसेच सोलापूरमध्ये मनसे नेत्याचा खून झाला होता. त्याच्या कुटुंबाला आपल्याला आधार द्यावासा का वाटला नाही, असा सवालही अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. अमित ठाकरे म्हणाले, हा व्हिडिओ कोणत्याही प्रचारासाठी नसून एका सामान्य नागरिकाचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. मी राजसाहेबांचा मुलगा म्हणून नाही, कोणत्या पक्षाचा नेता म्हणून नाही, तर एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय. मी तुमचं प्रचार बघतोय, मी तुमच्या मुलाखती बघतोय. पण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारले गेले पाहिजेत, दुर्दैवाने ते विचारले जात नाही. तेच मी आज विचारायला आलो असल्याचे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित आहेत? पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले, पहिला प्रश्न तुम्ही ज्या महागाईच्या मुद्द्यावरून निवडून आलात. 2014 ते 2026, तुम्ही मुख्यमंत्री होतात, उपमुख्यमंत्री होतात, त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री झालात आणि केंद्रातही तुमची सत्ता होती, तरी महागाई कमी का झाली नाही? दूसरा प्रश्न गेल्या 7 महिन्यात 93 मुली गायब झाल्या आहेत. बलात्काराच्या केसेस वाढत आहेत. असे असताना बलात्काराचा आरोप असलेल्या एका माणसाला तुम्ही तिकीट देतायत. गृहमंत्री म्हणून तुम्हाला वाटते का की महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित आहेत? असा सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. स्वच्छ हवा का देऊ शकला नाहीत? अमित ठाकरे पुढे म्हणाले, तिसरा प्रश्न, आपल्या शहरांचा AQI. या प्रदूषित हवेमुळे अस्थमा, कॅन्सर, हार्ट अटॅकसारखे अनेक आजार होता. तुम्ही एवढी वर्षे सत्तेत असूनही आम्हाला स्वच्छ हवा का देऊ शकला नाहीत? चौथा प्रश्न आहे ड्रग्सचा. आपल्या प्रत्येक शाळा आणि कॉलेजच्या परिसरात ड्रग्स विकले जात आहेत. आपली पुढची पिढी आपल्या डोळ्या देखत बरबाद होत आहे. हे तुम्हाला दिसत नाहीये का? राजकारणातली माणुसकी मेली आहे का? शेवटचा प्रश्न सोलापुरात निवडणुकांमुळे खून झाला. आपण पक्ष बाजूला ठेऊ, पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला त्या कुटुंबाला आधार द्यावासा नाही वाटला? राजकारणातली माणुसकी मेली आहे का? असा प्रश्न अमित ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, त्या महाराष्ट्राची ही परिस्थिती करून ठेवली तुम्ही, तुम्हाला जनतेला उत्तरे द्यावीच लागतील, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *