![]()
राज्यात अचानक मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आले असून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, फडणवीसांचे निकटवर्तीय चंद्रशेखर बावनकुळे हे पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा केला होता, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचा दावा करून खळबळ उडवली. आता या सर्व चर्चांवर मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः माध्यमांसमोर येत मोठा खुलासा केला आहे. गिरीश महाजन म्हणाले की, मी कधीच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हतो आणि आजही नाही. अमित शहा यांनी खडसेंना फोन केला होता, हे त्यांनाच माहीत. मला त्याबाबत काहीही माहीत नाही. त्यांची थेट हॉटलाईन असेल, ते मागे तसे म्हणालेही होते. बच्चू कडू मोठे नेते आहेत, ते रोज काही ना काही बोलत असतात. त्यांना काहीतरी झाले असेल. अशा काही लोकांबद्दल न बोललेलंच बरं.
राऊतांच्या जिभेला मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत यांच्या विधानांना फार उत्तर देण्याची गरज नाही. त्यांच्या जिभेला हाड नाही, तर मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे. ते काहीही बोलत असतात. त्यांना गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर दिसत आहेत, तर त्यांनी ते शोधून दाखवावेत. स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्यांवर तोंडसुख घ्यायचं, हाच त्यांचा धंदा आहे. ते पंतप्रधान, सरन्यायाधीश, निवडणूक आयोगापासून ते फडणवीस आणि शिंदेंवर वाटेल तशी टीका करतात. पक्षात फक्त ‘हम दो हमारे दो’ उरणार गिरीश महाजन म्हणाले की, भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षात केवळ ‘हम दो हमारे दो’ म्हणजेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेच शिल्लक राहतील. नाशिकमधील ठाकरे गटाचे नगरसेवक फुटण्याच्या चर्चा मला माहीत नाहीत, पण आता संजय राऊतांकडे उरलं काय आहे? त्यांच्याकडे महापालिका नाही, विधान परिषदेला 17 पैकी एकही आमदार निवडून आला नाही, नगरपालिका नाही. भविष्यात त्यांना दोन-पाच टक्केही वाव नाही, त्यांनी स्वतःचा पक्ष बुडवला हेच पुरेसे आहे. संबंधित वृत्त वाचा फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये जाण्यात रस नाही- एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला स्वतः फोन करून दिल्लीला बोलावले होते आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर निमंत्रण दिले होते, असा दावा खडसे यांनी केला आहे. मात्र, महाजन यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे आणि ‘ब्लॅकमेलिंग’च्या राजकारणामुळे हा प्रवेश रखडल्याचा आरोप त्यांनी केला. वाचा सविस्तर
खडसेंची थेट दिल्लीत हॉटलाईन असेल:मी कधीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हतो अन् नाही, बच्चू कडू मोठे नेते, रोज काहीही बोलतात- गिरीश महाजन
