शेरनी अगर शांत है, तो डकारणा नहीं भूलती:नवनीत राणांचा विरोधकांना थेट इशारा, स्वाभीमानामुळे राज्यसभेला ठोकर मारल्याचे मत व्यक्त




लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ‘माजी खासदार’ झाल्याचे शल्य मनात असले तरी आपण शांत बसलेलो नाही, असा सज्जड इशारा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी विरोधकांना दिला आहे. अमरावतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला. यावेळी त्यांनी राज्यसभा खासदारकीवरूनही मोठा दावा केला आहे. अमरावतीचे विद्यमान खासदार बळवंत वानखेडे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना नवनीत राणा यांनी आपल्या आक्रमक शैलीत उत्तर दिले. “मी माजी खासदार झाले, याच्या वेदना मनाला नक्कीच होतात, पण त्यावर मी कधी जास्त भाष्य करत नाही. मी विरोधकांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, पण याचा अर्थ मी शांत बसले आहे, असा मुळीच होत नाही. ‘शेरनी अगर शांत है तो डकारणा (डरकाळी फोडणे) कभी छोडती नहीं’, हे त्यांनी कायम लक्षात ठेवावे,” असा थेट इशारा राणा यांनी दिला. महिलांबद्दल वक्तव्य करताना विरोधकांनी मर्यादांचे भान पाळले पाहिजे, आपण स्वतःची मर्यादा कधीही ओलांडली नसल्याचेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. स्वाभिमानासाठी राज्यसभेच्या संधीला मारली ठोकर राजकीय वर्तुळात नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची चर्चा होती, यावर बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “राजकारणात साध्या नगरसेवकपदासाठी लोक लोटांगण घालताना दिसतात. पण नवनीत राणाचा स्वाभिमान इतका अटळ आहे की, तिने राज्यसभेची संधी सोडून आपला स्वाभिमान जपला. मी राज्यसभेसाठी कधीही दुसऱ्याच्या दारात गेले नाही, तर त्या संधीला ठोकर मारली. मी माझ्या विचारांची पक्की आहे,” असे नवनीत राणा म्हणाल्या. सगळे बरबाद झाल्यावर त्यांना राम आठवला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या ‘हनुमान चालीसा’ वादावरून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत जळजळीत टीका केली. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मला ४० अंश सेल्सिअस तापमानात १४ दिवस जेलमध्ये टाकले. आयुष्यातील ते १४ दिवस मी कधीही विसरणार नाही. आमची जी लढाई होती, ती आम्ही लढलो,” असे त्या म्हणाल्या. “जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर होते, तेव्हा त्यांना हनुमान चालीसाचे वावडे होते. पण जसे ते पदावरून खाली उतरले आणि त्यांनी स्वतःचा पूर्ण पक्ष बरबाद करून टाकला, तेव्हा जाऊन त्यांना रामाचे नाव आणि हनुमान चालीसा आठवली. मुख्यमंत्री असतानाच जर त्यांनी हनुमान चालीसा वाचली असती, तर ना त्यांचे आमदार फुटले असते, ना घर फुटले असते, ना पक्ष बरबाद झाला असता,” असा बोचरा टोला नवनीत राणा यांनी लगावला. फडणवीसांवर व्यक्त केला विश्वास स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर बोलताना राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस हे आमदार रवी राणा यांच्या नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभे असतात, त्यामुळे या मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास ते निश्चितपणे करतील, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला. हे ही वाचा… मातोश्रीवर बंगालचा जादूगार येतो, हे सर्वांना माहीत आहे:विनायक, संजय राऊतांवर मंत्री शिरसाटांची टीका, पवारांच्या स्तुतीवरही मांडली भूमिका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आज राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर सडेतोड भाष्य करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरील जादूटोण्याचे आरोप, संजय राऊत यांची राजकीय भविष्यवाणी, शरद पवारांनी केलेले राज्य सरकारचे कौतुक, अंधेरीतील मराठीचा अपमान आणि बाबा फर्जन यांच्या घरावरील छापा अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *