![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एका मुलाखतीत बोलताना भावूक झाल्याचे दिसून आले. पत्रकारांनी याविषयी टोकताच त्यांनी हे अश्रू नव्हे तर अंगार असल्याचे नमूद करत त्यांनी त्याचा दोष मुंबईतील प्रदुषणाला दिला. मातोश्रीने वाचवले
.
उद्धव ठाकरे यांनी आज एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात एका प्रश्नाला उत्तर देताना ते भावूक झाल्याचे दिसून आले. ते म्हणाले, उपनगरात राहणारी एक मराठी महिला परदेशातून आली होती. त्यांनी मातोश्रीत येऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. भेटल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू आले. हे वैभव आहे ते आहे. ते तुम्ही बदनाम का करता? ते बदनाम करू नका. मी कुठे काय तुमच्याबद्दल बोलतोय. मी राजकारणातले बोलतो. जे पटत नाही त्यावर बोलतो. मी कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही. अगदी नरेंद्र मोदी मला नकली संतान म्हणाले. ही कोणती संस्कृती?
तुम्हाला मातोश्रीने वाचवले. अन्यथा मोदी दिसलेच नसते. आमचे प्रमोद महाजन असते तरी ते दिसले नसते. कारण, प्रमोद एक कर्तबगार माणूस होता. त्यांना संपूर्ण देशाची जाण होती. त्यांचा जन्म कुठे झाला हे मला माहिती नाही. पण ते मुंबईत आले तर त्यांना मुंबईची पक्की माहिती असायची, पुण्यात गेले तर पुण्यातील गोष्टी, दिल्लीत गेले तर दिल्लीतील किंवा इतर कोणत्याही राज्यात गेले तर त्यांना तेथील गोष्टी माहिती असायच्या.
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तेव्हा मोदींना राजधर्माची शिकवण देत उचलून फेकत होते. तेव्हा ज्या मातोश्रीने व बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवले त्या बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही नकली संतान म्हणालात, असे ते म्हणाले.
हे अश्रू नव्हे, अंगार आहेत
यावेळी पत्रकाराने उद्धव यांना तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याचे सांगितले. त्यावर उद्धव म्हणाले, हे अश्रू नाहीत. हे अंगार आहेत. हे कदाचित प्रदुषणामुळे झाले असेल. मी अश्रू ढाळणाऱ्यांपैकी नाही. मला जे पटत नाही ते पटत नाही. पण मला माझ्या शत्रूचे पटले तरी मी ते मला पटले म्हणून सांगतो. माझी अशीच दुसऱ्यांकडूनही आहे. माझे पटत नसेल, तर मला समजून सांगा. कारण, माझे आजोबा व्यासंगी होते. ते म्हणायचे मी इतिहास चिवडतो. ते इतिहासातील गोष्टी बाहेर काढायचे. बाळासाहेबांची ओळख करून द्यायची गरज नाही. टीका अशी केली पाहिजे की, त्यात ओरबाडणे असता कामा नये.
टीकाकाराला कळले पाहिजे की नेमके त्याचे काय चुकत आहे. आता आपण लोकांच्या आयुष्याशी खेळतोय. बिनविरोध निवडणुका करून लोकांच्या मतदानाचा अधिकार काढून घेत आहोत. निवडणुकीत वाट्टेल तसे पैसे वाटून सत्ता मिळतोय. पुन्हा सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता असा खेळ सुरू आहे. पण सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याचे काय? याचे मला वाईट वाटत आहे. आम्हाला लोकांच्या आयुष्यासाठी सत्ता हवी आहे. आता लोकांनी त्यांना त्यांचे जीवन कसे हवे हे ठरवले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई महापालिकेचा 15 तारखेला रणसंग्राम
उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई महापालिकेसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी भाजपच्या प्रमुख नेत्यांची एक मोठी फौज मुंबईच्या रणांगणात उतरली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी युती केली आहे. ठाकरे बंधू एकदिलाने या निवडणुकीत भाजपच्या बलाढ्या ताकदीचा सामना करत आहेत. काँग्रेसने या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करून आपली वेगळी वाट निवडली आहे. शरद पवार या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या मागे उभे आहेत.
