हिंगोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय काँग्रेस समितीच्या बैठकीत शनिवारी ता. १० घेण्यात आला आहे. त्यासाठी बुथसमित्या, गटनिहाय समित्यांकडे लक्ष दिले जाणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले. तर पक्ष सोडलेल्यांचा विषय
.
हिंगोली येथील सराफ ब्लँक्वेट हॉल येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पक्षाच्या अखील भारतीय काँग्रेस समितीच्या पदाधिकारी तथा मराठवाडा सह प्रभारी रेहाना चिश्ती, मलंग शेख, जिल्हा प्रभारी कल्याण दळे, सहप्रभारी साहेबराव कांबळे, नागसेन बिरजे, जिल्हाद्यक्ष सुरेश सराफ, विनायक देशमुख, डॉ. सतीष पाचपुते, गजानन देशमुख, डॉ. रमेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हयातील काँग्रेसच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर ठिक अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचेही ठरविण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्वबळाचा नारा दिला.
हिंगोली जिल्हयात कोणाच्याही पक्षातून बाहेर जाण्याने पक्षाचे नुकसान झाले नाही. ज्यांना काँग्रेसने मोेठे केले त्यांनी पक्ष सोडला. मात्र आता पक्ष सोडणाऱ्यांचे नांव घेऊन विनाकारण मोठे करू नका असेही नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आगामी काळात जिल्हयात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बुथ समित्या, जिल्हा परिषद गटनिहाय समित्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून गावपातळीवर जनसंपर्क वाढविण्याचा निर्णय यावेळी घेेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नांव बदलू नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणा यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
