![]()
मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना भीषण अपघात झाला, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून लँडिंगदरम्यान विमान जमिनीवर आदळल्याने झालेल्या मोठ्या स्फोटात विमानाला आग लागली. या धक्कादायक घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘या प्रकरणात अद्याप एफआयआर का दाखल झाला नाही?’ असा सवाल उपस्थित करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली असून, त्यांच्या या आरोपानंतर आता सीआयडीने तातडीची पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर आपली अधिकृत भूमिका मांडली आहे. पुण्यात पार पडलेल्या विशेष पत्रकार परिषदेत सीआयडीने स्पष्ट केले की, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास आता घातपात, यंत्रणेचा निष्काळजीपणा आणि संभाव्य गुन्हेगारी कृत्याच्या कोनातून अधिक तीव्र करण्यात आला असून, हा केवळ अपघात होता की पूर्वनियोजित कट, याचे सत्य समोर आणणे हाच या तपासाचा प्राथमिक उद्देश आहे. अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. अतिशय प्रोफ्रेशनल पद्धतीने सीआयडी तपास करत आहे. केंद्रातल्या अनेक संस्था तपासात सहकार्य करत आहेत. एएआयबीशी सीआयडीचा सातत्याने समन्वय सुरू आहे. एएआयबीचा तपास संपल्यानंतर त्यांच्या अहवालाचा निष्कर्ष सीआयडी तपासादरम्यान लक्षात घेणार आहे. महाराष्ट्र सरकारने तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. जर घातपात, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कृत्य निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करेल, अशी माहिती सीआयडीने दिली आहे. तसेच व्हीएसआर कंपनीवर डीजीसीएकडून कारवाई झाली आहे, तुमच्या तपासात या कंपनीकडून हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आल आहे का? असा सवालही यावेळी करण्यात आला. याला उत्तर देताना सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, तांत्रिक तपास हा वेगळा भाग आहे आणि आमचा सीआयडीचा तपास हा आकस्मिक मृत्यूबद्दल आहे. आमच्या तपासात काही पुरावे मिळाले आहेत. AAIB चा अहवाल आला की तो आमच्या तपासात समाविष्ट केला जाईल.
अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरू:घातपात आढळून आल्यास कारवाई होणार, CIDचा पत्रकारपरिषदेत मोठा खुलासा
