अहिल्यानगर (प्रतिनिधी)-नांदेडहून पुण्याकडे निघालेल्या संगीतम ट्रॅव्हल्सच्या बसचा अहिल्यानगर–पुणे मार्गावर कामरगावजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेमुळे खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 19 सीएक्स 7776 क्रमांकाची संगीतम ट्रॅव्हल्स बस नांदेडहून पुण्याकडे प्रवास करत होती. बस अहिल्यानगर पार केल्यानंतर कामरगाव जवळ पहाटे साडेचारच्या सुमारास समोर चालत असलेल्या ट्रकला धडकली. धडकेनंतर बस रस्त्याच्या दुभाजकावर चढल्याने मोठा अनर्थ टळला.
अपघाताच्या वेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक बसला जोराचा धक्का बसल्याने प्रवासी घाबरून जागे झाले आणि तत्काळ खाली उतरले. या घटनेत काहींना किरकोळ धक्का बसला असला तरी सुदैवाने मोठी दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, काही प्रवाशांनी गंभीर आरोप करत सांगितले की बसचा चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता. तसेच नांदेड ते पुणे या लांबच्या प्रवासासाठी फक्त एकच चालक देण्यात आला होता, असेही प्रवाशांचे म्हणणे आहे. अति कामाच्या ताणामुळे चालकाने मद्यप्राशन केले असावे आणि त्यातूनच हा अपघात घडल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती.
अपघातानंतर त्या मार्गावरून संगीतम ट्रॅव्हल्सच्या आणखी तीन ते पाच गाड्या गेल्या; मात्र प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, मदतीची विनंती करूनही त्या गाड्यांनी थांबून मदत केली नाही. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी ट्रॅव्हल्स व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ही घटना पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्समधील चालकांवर नियंत्रण कोणाचे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? हा गंभीर प्रश्न उपस्थित करते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी दोन चालकांची व्यवस्था, चालकांची वैद्यकीय तपासणी आणि कडक नियंत्रण व्यवस्था याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

