मध्यम पावसाने तिवसा तालुक्यातील पिके बहरली:तीन दिवसांपासून दिलासा, जोरदार पावसाची प्रतीक्षा




तिवसा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. दहा दिवसांच्या खंडानंतर आलेल्या या पावसामुळे शेतातील पिके पुन्हा बहरली आहेत. सध्या तरी तालुक्यात पावसामुळे कोणत्याही नुकसानीची नोंद नाही, मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून, त्यांची वाढ चांगली होत आहे. या तालुक्यात सोयाबीन हे शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. सुरुवातीला मान्सूनच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, परंतु काही ठिकाणी बोगस बियाण्यांमुळे नुकसान झाले. तसेच, अल्प पावसामुळे जमिनीत पुरेसे पाणी मुरले नव्हते. काही शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. २५ जुलैपासून पावसाने जोर धरल्याने आणि २८ जुलैपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाल्याने उर्वरित बहुतांश पेरण्याही आता पूर्ण झाल्या आहेत. २८ जुलैपासून तिवसा तालुक्यात सतत पाऊस पडत आहे. काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे, ज्यामुळे शेतजमिनीला आणि पिकांना चांगला फायदा होत आहे. असे असले तरी, अद्यापही नदी-नाले दुथडी भरून वाहिले नाहीत, हे वास्तव आहे. जोरदार पावसाची अजूनही गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *