![]()
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माणिक मोती गळाले असा उल्लेख करत त्यांनी सत्ताधारी मंत्रिमंडळावर टीकेची झोड उठवली. महायुतीतील दोन घटक पक्षांना इशारा देत राऊत
.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोठा दावा केला. आपण आज शरद पवार यांची भेट घेणार असून आघाडीबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्याशी संवाद सुरू असून काँग्रेसकडूनही सकारात्मक संदेश आल्याचे राऊत म्हणाले. मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचाच असेल आणि तो अस्सल मराठी माणूस असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकांमध्ये मुंबईवर ठाकरे गटाचाच झेंडा फडकणार, असा आत्मविश्वास दाखवत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले.
धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यावरही संजय राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. वाल्मिक कराड अजूनही तुरुंगात असून प्रकरणाचा खटला पूर्ण झालेला नाही, अशा परिस्थितीत गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देणे हे पाप ठरेल, असे त्यांनी म्हटले. भ्रष्टाचार आणि गुंडगर्दीच्या आरोपांमुळे फडणवीस मंत्रिमंडळातील एकाच गटाचे दोन मंत्री गेले, हीच या सरकारवर लागलेली मोठी काळीमा असल्याचे त्यांनी नमूद केले. शिंदे गटात असे अनेक मंत्री असल्याचा दावा करत त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली. पैशांच्या बॅगा, संशयास्पद व्यवहार आणि इतर गंभीर मुद्दे सर्वांना दिसत असतानाही सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राऊतांनी केला.
माणिकराव कोकाटे प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी सरकारवर थेट संरक्षण दिल्याचा आरोप केला. कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू असून त्यातून आम्ही भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी आहोत, असा संदेश दिला जात असल्याचे ते म्हणाले. आमदार, खासदार किंवा मंत्री कोणीही भ्रष्ट असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे, पूर्ण संरक्षण दिले जाईल, असा संकेत सत्ताधारी देत असल्याचा आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर अमित शहा आणि धनंजय मुंडे यांची भेट ही देखील याच संदेशाचा भाग असल्याचा दावा राऊतांनी केला. महाराष्ट्रात हा संदेश देवेंद्र फडणवीस देत असून दिल्लीतून अमित शहा तोच सूर आळवत असल्याचे त्यांनी सांगितले.
