माणूस या शब्दाचा अर्थच धडपड हा आहे. सन्मानाने टिकण्यासाठी, स्वतःला सतत सक्षम वा योग्य करण्यासाठीच ही धडपड असते. या धडपडीचेच नाव विद्रोह हे आहे. या धडपडीचा प्रारंभ हाच माणसाच्या जगण्याचा प्रारंभ होता. हा विद्रोहाचाच प्रारंभ होता आणि जीवनाचे सौंदर्य हेच त्याचे ध्येय होते. विद्रोह आणि सौंदर्य या बोधिवृक्षाच्या एकाच पानाच्या दोन अविभाज्य बाजू आहेत. सौंदर्याच्या तहानभूकेपोटी विद्रोह जन्माला येतो आणि विद्रोहाच्या अनिवार्यतेपोटी सौंदर्य जन्माला येते.
विद्रोह आणि सौंदर्य ही माणसाची सहजप्रवृत्तीच आहे. माणसाच्या या डीएनएने मानवी जगाचा प्रारंभही केला आणि आजवरची नवलाची वाटचालही केली. विद्रोह वा सौंदर्य ही माणसाची मूलप्रकृती आहे आणि या मूलप्रकृतीकडे पाठ फिरवणे वा तिला विरोध करणे ही विकृती आहे. विद्रोह हेच जीवनाचे परमसत्यही आहे आणि परमसौंदर्यही आहे. या परमसौंदर्यसत्यानेच आणि परमसौंदयानेच माणसाला गगनभेदी माणूस केले.
स्वतःला योग्यतम करण्याच्या संग्रामात तो कधीकधी अपयशीही झाला. अशाच अपयशी मनोवस्थेत त्याने ईश्वर निर्माण केला आणि त्याच्या बुद्धीच्या सार्वभौमत्वाची त्यानेच नाकेबंदी केली. मनाच्या हरलेल्या अवस्थेत त्याने ईश्वर निर्माण केला आणि ही ईश्वराची कल्पना पुढे हरलेली मने निर्माण करीत राहिली. ही माणसाच्या स्वाभिमानाची, त्याच्या स्वतंत्र, स्वयंदीप, परावलंबनमुक्त आणि सार्वभौम होण्याच्या इच्छेची त्याच्याच हातून झालेली गळचेपी होती. ईश्वर या बेडीसोबत स्वर्ग, नरक, पुर्वजन्म, पुनर्जन्म, पापपुण्य आणि विषमता अशा बेड्यांची दहशत निर्माण झाली. सामाजिक, आर्थिक आणि मानसिक शोषणाचे एक अमानुष सत्ताक निर्माण झाले. यामुळे विद्रोहाचे काही काळ खच्चीकरण आणि सौंदर्याचे विद्रुपीकरण झाले. सत्य गरीब झाले आणि असत्य शिरजोर झाले. शिरजोरपणाला ’अध्यात्म’ म्हटले जायला लागले. असत्याला लोकमान्यता मिळणे हा तात्त्वज्ञानिक आणि नैतिक भ्रष्टाचारच होता. या द्रोहाने विद्रोहाला आणि सौंदर्याला परिघावर आणि परिघाबाहेर ढकलले पण या अनुभवाने विद्रोहही आणि सौंदर्यही अधिक प्रखर आणि अन्वर्थक झाले.
या विद्रोहमय सौंदर्याने सतत तत्त्ववेत्त्यांचा आणि प्रतिभावंत साहित्यिकांचा शोध घेतलेला आहे. सदसद्विवेक हा विधायक आणि विघातक, इष्ट आणि अनिष्ट यांच्यातील निवड करून देणारा मापदंड आहे. सत्य आणि असत्य, विद्रोह आणि द्रोह वा सौंदर्य आणि कुरूपता यातील सत्य, विद्रोह आणि सौंदर्य यांची निवड हाच मूल्यदंड करून देतो. या सदसद्विवेकालाच सौंदर्य वा विद्रोह म्हणायला हवे.
खरे म्हणजे विद्रोहाच्या पोटी सौंदर्य जन्माला येते आणि सौंदर्याच्या तहानभुकेतच विद्रोह उगवतो. कधी विद्रोह हे कारण आणि सौंदर्य हे कार्य ठरते तर कधी सौंदर्याची गरज हे कारण असते आणि विद्रोह हे कार्य ठरते. असा हा सर्जनशील प्रतीत्यसमुत्पादच असतो. विद्रोह हाच विद्रोहाचा उद्देश असतो. विद्रोह हीच विद्रोहाची प्रास्ताविका असते आणि तेच त्याचे संविधानही असते. उजेडापुढील अवरोधाचे निर्मूलन हाच विद्रोहाचा जन्महेतू असतो तर सौंदर्याच्या प्रवाहातील विद्रूपांचे निर्मूलन हाच सौंदर्याचाही जन्महेतू असतो. अवरोध आणि विद्रूपता म्हणजे द्रोह! थांबणे, थांबवणे आणि थांबवण्याच्या सर्व यंत्रणा हे सर्व विकृतीचेच प्रकार असतात. या विकृतींमुळे माणसांच्या मनांची, भावनांची, संवेदनांची आणि विचारांची डबकी तयार होतात. पाण्याचे वाहतेपण थांबले की डबके तयार होते, त्यातले पाणी कुजते, त्यात किडे तयार होतात. क्रमाने डबके आटते. प्रकृतीला विकृती अशी विद्रूप करते. या विकृतीसाठी जीवनाची दारे बंद करणे म्हणजे विद्रोह। सौंदर्य म्हणजे जिवंत वाहतेपणा! जिवंत पाणी म्हणजे जिवंत जीवन. वाहत्या पाण्यासारखी अधिकाधिक उज्ज्वल होत जाते तिला संस्कृती म्हणतात. या संस्कृतीला थांबविणे म्हणजे विकृती! पण अनेक लोकांना संस्कृतीच माहीत होऊ दिली जात नाही. हे लोक त्यांना दिलेल्या शिक्षणानुसार विकृतीलाच संस्कृती म्हणण्याची पवित्र वा मूलतत्त्वी परंपरा निर्माण करतात. मग जीवनाचा समतोलच ढासळत जातो. विद्रोहाची सिद्धनाक भूमिका या स्थितीत उगवते. विद्रोह ही जीवनाचीच व्याख्या आहे आणि सौंदर्य ही विद्रोहाचीच व्याख्या आहे. कुंठित मनांना रुग्ण वा त्रस्त करणारे जे असेल ते सर्व जीवनाच्या जिवंतपणासाठीच विद्रोह नाकारतो. परंतु द्रोह माणसाच्या नवनवोन्मेषशाली बुद्धिमत्तेला आणि प्रतिभेलाच नाकारतो. हे विद्रोह आणि द्रोह यांच्यातले वा सौंदर्य आणि विद्रूपता यांच्यातलेच मूळ भांडण असते.
जे मन स्वतःचेही आणि इतरांचेही परावलंबन मान्य करीत नाही तेच खरे परावलंबनमुक्त मन असते. अशा परावलंबनमुक्त मनांचा स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि बंधुता भगिनीता जपणारे मन म्हणजे सौंदर्य! हे सौंदर्य होण्यासाठीच साहित्याची आणि तत्त्वज्ञानांची धडपड असायला हवी. सर्वांमधीलच सौंदर्याची ही भूक सौंदर्य या उदयबिंदूपासून सुरू होते आणि पौर्णिमा या नितळबिंदूपर्यंत पोचते.
सौंदर्याची आणि विद्रोहाची परंपरा निश्चित करण्याचे प्रमाणशास्त्र या लेखात वर आलेले आहेच. अध्यात्म, विषमता आणि शोषण अशा कोणत्याही आविष्काराचा अंतर्भाव या सौंदर्यमय विद्रोहाच्या परंपरेत केला जाऊ नये. उजेडात अंधार कालवू नये. विद्रोहात द्रोह मिसळू नये. चातुर्वर्ण्यांची रचनाही विद्रूपता आणि मानवद्रोहच आहे. विद्रोहाचे युद्ध चातुर्वंर्ण्यासोबत, स्त्रीपुरुषविषमतेसोबत आणि इतर सर्वच सामाजिक आणि आर्थिक विषमतांसोबत आहेत. परंपराशोध घेताना हे मूल्यभान काटेकोरपणे पाळले जावे.
सौंदर्याची आणि विद्रोहाची भाषा इहवादीच असायला हवी. अध्यात्माने इहलोकाच्या भाषेचे उगम बंद करण्याचा प्रयत्न केला. हा इहवादी भारतीयत्वावर, त्याच्या विद्रोहावर आणि सौंदर्याबर केलेला अत्याचारच आहे. जे विद्रोही असतात ते भौतिकच वा इहविज्ञाननिष्ठच असतात. त्यांनी चैतन्यवादी भाषा वापरू नये आणि विद्रोहाचे चारित्र्य प्रदुषित करू नये. तो विद्रोहाशी आणि सौंदर्याशीही केलेला द्रोह ठरेल.
– यशवंत मनोहर
मो. +91 80071 55577
Post Views: 7
