![]()
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लिपिक राजेंद्र ढेरिंगेला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने ढेरिंगेला जामीन मंजूर केला आहे. राजेंद्र ढेरिंगेची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली आणि त्यात त्याला दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. लिपिक राजेंद्र ढेरिंगेविरोधात कठोर कारवाईचे आदेश झिरवाळ यांनी दिले आहेत. तसेच केवळ चौकशीच नव्हे तर त्याची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागातील दक्षता पथकाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, वस्तुनिष्ठ व सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, एसीबीच्या पथकाने राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिक रोड येथील घरात काही दिवसांपूर्वी झडती घेतली होती. या झडतीत काही महत्त्वाचे कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. तसेच ढेरिंगे हा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून, गेल्या वर्षीच तो अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तिवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत होता. लाचखोरीनंतर काय म्हणाले होते नरहरी झिरवाळ? नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणी विस्तृत स्पष्टीकरण दिले होते. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले होते, माझ्या विभागातील क्लार्क लाचखोरीच्या प्रकरणात सापडला ही माझीही जबाबदारी आहे. ही जबाबदारी माझी नाही असे बोलून चालणार नाही. त्याने जे कृत्य केले आहे, त्या कृत्याला मी पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्या चौकशीत या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत आले तर मी स्वतःहून 100 टक्के मंत्रिपदाचा राजीनामा देईन. तसेच नरहरी झिरवाळ यांनी आपले खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर कडक कारवाई केली आहे. त्यांनी रामदास गाडे यांना अन्न व औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करत त्यांना परत त्यांच्या मूळ आस्थापनेत पाठवण्याचे आदेश दिलेत.
लाचखोर लिपिक राजेंद्र ढेरिंगेला जामीन मंजूर:35 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते; नरहरी झिरवाळांनी प्रतिनियुक्ती केली रद्द
