![]()
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जायकवाडी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून, धरणातील पाणीसाठा ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी रात्री धरणात ४७ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. यामुळे रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासांत १९६ दलघमी पाणीसाठा वाढला. रविवारी सकाळी ४८ टक्के असलेला पाणीसाठा रात्री १० वाजेपर्यंत ५३.४१ टक्क्यांवर पोहोचला. सध्या जायकवाडी धरणात ११५९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, एकूण पाणीसाठा १८९७ दलघमी इतका झाला आहे. मराठवाड्यात सध्या जायकवाडी वगळता इतर कुठल्याही मोठ्या धरणात पाणीसाठा आलेला नाही, त्यामुळे या चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष जायकवाडीकडे लागले आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, जायकवाडीतील वाढत्या पाणीसाठ्यामुळे कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जलतज्ज्ञ जे.एन. हिरे यांच्या मते, या पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगाम यशस्वीपणे राबवता येईल. हिरे यांनी सांगितले की, जायकवाडी धरण ५० टक्के भरल्यास किमान तीन पाणीपाळ्या देता येतील. तसेच, खरीप हंगामात पुन्हा पाऊस न झाल्यास खरिपासाठी एक पाणीपाळी द्यावी लागू शकते. या साठ्यामुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याची आणि औद्योगिक वापराची सोय होणार आहे. धरण १०० टक्के भरावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जायकवाडीच्या वरच्या धरणांमध्येही चांगला पाणीसाठा झाल्याने पुढील काही दिवसांत जायकवाडीचा पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दारणा धरण ८८ टक्के, भाम, भामा-आसखेड, वालदेवी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. गंगापूर धरणात ८७ टक्के, कश्यपी ९२ टक्के, तर भंडारदरा ९० टक्के आणि निळवंडे ७९ टक्के भरले आहे. यामुळे जोरदार पाऊस झाल्यास जायकवाडीत आणखी पाणी येण्याची शक्यता आहे.
जायकवाडी धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ:53 टक्के साठा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना सिंचनाची आशा
