अंजली दमानियांवर कायदेशीर कारवाई करणार:रुपाली चाकणकरांचा थेट इशारा, म्हणाल्या – त्यांची अतिशय घाणेरडी मानसिकता




सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूवरून शंका उपस्थित केली. तसेच त्यांनी पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्यावरून देखील भाष्य केले. यावरून त्यांच्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. अंजली दमानिया यांची आजची पत्रकार परिषद ऐकून समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृत असू शकते, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या, अंजली दमानिया यांना अनेक कपोलो कल्पित कथा सांगायची सवय आहे. एखाद्या व्यक्तीला आणि एका कुटुंबाला अंजली दमानिया सातत्याने बदनाम करत असतात. यापूर्वी देखील अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर अनेक आरोप केले, पण त्यातला कुठलाही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. आता त्या पार्थ पवार यांच्यावर आरोप करत आहेत. ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे, असे चाकणकर म्हणाल्या. पुढे बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, खरेतर या कुटुंबीयांनी आपला घरातला माणूस गमावला आहे. अंजली दमानिया पुराव्या अभावी सातत्याने वक्तव्य करून चर्चेत राहत आहेत. ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे. अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा चाकणकर यांनी केला आहे. असंवेदनशीलतेचा निषेध व धिक्कार- अमोल मिटकरी दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ट्विट करत अंजली दमानिया यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, अंजली दमानिया यांनी दुःखाच्या क्षणी केलेली विधाने अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहेत. माननीय अजितदादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना, माध्यमांशी संवाद साधताना जाणीवपूर्वक संशय निर्माण करून वातावरण दूषित करण्याऐवजी, दुःखात सहभागी होणे अपेक्षित होते. तथ्यांशिवाय आरोप करणे हे ना माणुसकीला शोभते, ना जबाबदार सार्वजनिक भूमिकेला. आपल्या असंवेदनशीलतेचा निषेध व धिक्कार असल्याचे मिटकरी म्हणाले. काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया? पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचे खारगे समितीने म्हटले होते. मात्र या सर्व शक्यता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फेटाळून लावल्या आहेत. खारगे समितीतर्फे पार्थ पवार यांना कोणतीही क्लिन चीट मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांना खारगे समितीने कोणतीच क्लिन चीट दिलेली नाही. अजून समितीची शेवटची बैठक बाकी आहे. याविषयी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या धादांत खोट्या आहेत असे दमानिया यांनी म्हटले आहे. पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये का नाही याविषयी आमचा लढा आहे. कोणत्याही न्यायात सहानुभूतीचे कार्ड चालत नाही. हा जो घोटाळा पार्थ पवार यांनी केला आहे, त्यातून ते सुटणे शक्यच नाही. या प्रकरणाची सगळी कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे सहानुभूतीने या गोष्टी मिटणार नाहीत, असे दमानिया म्हणाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *