![]()
नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात तीव्रतेने उमटत आहेत. विद्यार्थ्यांवरील या कारवाईचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर हे आज थेट दिल्लीतील जंतरमंतरवर पोहोचले आहेत. तिथे पोहोचून त्यांनी पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. “ही हुकूमशाही फार वाईट…”; जानकरांचा सरकारवर हल्लाबोल जंतरमंतरवर मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “पोलीस आणि प्रशासनाने या मुलांना एवढं मारलं आहे की ते गेल्या तीन दिवसांपासून जेवणही करू शकत नाहीयेत. आता हे सरकार पलटी करण्याची वेळ आली आहे. देशात सध्या जी हुकूमशाही सुरू आहे ती अतिशय वाईट असून राष्ट्रीय समाज पक्ष या अमानुष कारवाईचा तीव्र निषेध करत आहे.” राज्यातील नेत्यांच्या जंतरमंतरवर भेटी दिल्लीतील या आंदोलनाला आता महाराष्ट्रातून मोठा राजकीय पाठिंबा मिळताना दिसत आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत थेट दिल्ली गाठली. “विद्यार्थ्यांवर पुन्हा हल्ला केला, तर महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही,” असा कडक इशारा जरांगे यांनी सरकारला दिला. उद्धव ठाकरेंचाही केंद्रावर घणाघात दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काल जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेत त्यांनी, “सत्तेची हवा डोक्यात गेली आहे, ती काढायला जनतेला वेळ लागणार नाही,” असा थेट इशारा केंद्र सरकारला दिला. तसेच, सरकार स्वतःच्या ‘मन की बात’ लादत असून जनतेचे ऐकून घेत नसल्याची टीकाही त्यांनी केली. आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आणि माजी खासदार जंतरमंतरवर पोहोचत आहेत. राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्या सहभागामुळे आता शेतकरी आणि सामाजिक संघटनांचाही या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसत असून, केंद्र सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. दिल्लीत उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर घणाघात: म्हणाले- रावण आणि तुमच्यात फरक काय? फडणवीसांच्या टीकेलाही दिले प्रत्युत्तर नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. काल त्यांनी जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. ‘सत्तेची हवा डोक्यात गेल्याने सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधत नाही,’ असा आरोप करत त्यांनी ‘तुमच्यात आणि रावणात फरक काय?’ असा सवाल सरकारला विचारला आहे. सविस्तर वाचा जंतरमंतरवर सलग तिसऱ्या रात्री हजारो आंदोलक:CJP च्या कार्यकर्त्यांची सुटका; दावा- मंत्री नड्डा, जितेंद्र सिंह वांगचुक यांना भेटले दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाचा आज ३३ वा दिवस आहे. मंगळवारी रात्री हजारो आंदोलक या ठिकाणी ठाण मांडून बसले होते; त्यांची तिथे ही सलग तिसरी रात्र होती. यामध्ये अशा व्यक्तींचाही समावेश होता ज्यांना २० जुलै रोजी झालेल्या ‘संसद मोर्चा’दरम्यान पोलिसांच्या लाठीमाराचा आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा सामना करावा लागला होता. सविस्तर वाचा
या मुलांना इतकं मारलं की 3 दिवस जेवले नाहीत:आता सरकार पलटी करण्याची वेळ, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत महादेव जानकरांचा घणाघात
