मंत्री गिरीश महाजन यांना चोहोबाजूंनी घेतल्यानंतर भाजपाने सुप्रसिद्ध विद्रोही गायिका अंजली भारती यांचा जुना व्हिडिओ उकरून काढला. गायक अंजली भारती यांनी भंडारा तालुक्यातील फुलमोगरा (अशोकनगर) येथील एका कार्यक्रमात बलात्काराच्या घटनांवर बोलताना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. अखेरीस पोलिसांनी अंजली भारती यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा नोंदविला आहे. १३ जानेवारी रोजी भंडारा तालुक्यातील अशोकनगर फुलमोगरा येथे मराठवाडा विद्यापिठाच्या नामविस्तार वर्धापण दिनानिमीत्त संदेश ज्ञानेश्वर वासनिक व इतरांनी प्रबोधनात्मक भीम गितांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना अंजली भारती यांनी राज्यातील बलात्काराच्या घटनांबद्दल नाराजी आणि संताप व्यक्त केला.
बलात्काराच्या घटनांवर बोलताना अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत अपमानास्पद भाषा वापरली. भारती यांच्या वक्तव्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अंजली भारती रा. नागपूर यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक संदेश वासनिक व इतकारांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. अंजली भारतींनी या मेळाव्यात व्यासपीठावरून उपस्थितांशी संवाद साधताना बलात्कारासारख्या भीषण गुन्ह्याबाबत टीका केली. “लहान लहान मुलींवर बलात्कार केले जात आहेत. कुठे मानसिकता घसरत चालली आहे समाजाची? विचार करा तुम्ही. दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. हे म्हणतात फाशी द्या, फाशी द्या. सरकार कसं फाशी देणार? हे मोदी सरकार फाशी देणार आहे का?” असा सवाल अंजली भारतींनी उपस्थित केला.
कार्यक्रमादरम्यान बोलताना अंजली भारतींनी बलात्कार करणाऱ्यांचं डोकं छाटण्याचं जाहीर आव्हान व्यासपीठावरून दिलं. “यांना काय माहिती आया-बहिणींवर बलात्कार झाला तर काय दु:ख होतं. मोदी सरकार कशी फाशी देणार? फाशी दिली तर त्यांची व्होटबँक दुरावेल. त्यांची मतं कमी होतील. त्यांची माणसं निवडून येणार नाहीत. मी या व्यासपीठावरून आव्हान करते की असा बलात्कार करणाऱ्याचं डोकं जो कुणी कापून आणेल, त्याला मी माझी निम्मी प्रॉपर्टी आणि ५० लाख रुपये देईन. कुणीही बलात्कार करण्याच्या आधी विचार केला पाहिजे की हे माझ्या मृत्यूचं फर्मान आहे. असं ज्या दिवशी तुम्ही कराल, तेव्हा कुणीही आया-बहिणींवर अत्याचार करू धजावणार नाही”, असं अंजली भारती म्हणाल्या. अमृता फडणवीसांबाबत अश्लाघ्य भाषेत विधान केले. दरम्यान, यावेळी अंजली भारतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत अश्लाघ्य भाषेत टीका केली. भाजपाप्रणीत सत्ताधाऱ्यांकडून बलात्काऱ्यांवर मतांच्या राजकारणापोटी कारवाई केली जात नसल्याचा दावा करतानाच अंजली भारतींनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख केला. त्यामुळे अंजली यांच्यावर व्यापक स्तरावर टीका केली. गायिका अंजली भारती यांनी अमृता फडणवीस यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीविरोधात मिरा भाईंदर भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे. मिरा भाईंदर भाजप महिला जिल्हाध्यक्षा वैशाली भोईर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कनकिया पोलीस ठाण्यात जाऊन अंजली भारतीविरोधात लेखी तक्रार दाखल केली. महिलांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच, दोषींवर कारवाई होईपर्यंत भाजप शांत बसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

अंजली भारतीचे वक्तव्य एका महिलेने दुसऱ्या महिले संदर्भात अजिबात बोलू नये अशा स्वरूपाचे आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी संदर्भात अंजली भारती असं बोलू शकत असेल, तर राज्यातील सामान्य स्त्रियांबद्दल तिचे विचार कसे असेल असा सवाल भाजपच्या महिला आघाडीने विचारला आहे. जर अंजली भारतीच्या विरोधात कठोर कारवाई केली नाही, तिला अटक केली नाही तर नागपूर जिल्ह्यातील उमरेड रोड येथे एक फेब्रुवारी रोजी होणारा अंजली भारतीचा कार्यक्रम आम्ही उधळून लावू असा इशाराच महिला आघाडीने दिला आहे. यासंदर्भात भाजप महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची भेट घेत मागणीचे निवेदन दिले. आणखी एका ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किंबहुना अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होतील, यात आश्चर्य नाही. महिला आयोगही मैदानात उतरला आहे. कारण भारतीने वक्तव्यच असे केले की, सर्वच स्तरांतून निषेध व्हावा. ही अत्यंत जहरी टीका आहे. एक स्री असून एका स्रीबद्दल असे घाणेरडे बोलणे अत्यंत लांच्छनास्पद असल्याचे लोक बोलत आहेत. आंबेडकरवादीही निषेध व्यक्त करण्यासाठी पुढे येत आहेत. तिची ती चूक आहेच. परंतु तिच्या बोलण्यातला मतितार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात बलात्काराच्या हजारो घटना घडतात. गोरगरीब कुटुंबातील मुलीवर किंवा महिलेवर बलात्कार होतो. सामुहिक बलात्कार होतो. नग्न धिंड काढली जाते. इथे जात पाहून न्याय दिला जातो. एखाद्या गरीब, दलित मुलीवर अत्याचार होतो आणि तिचा खून होतो तेव्हा महिला आयोगाची दातखिळी बसते काय? हा प्रश्न आहे. सरकारही बहिरे झालेले असते. हा टाहो कुणालाही ऐकू येत नाही. अंजली भारती यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्र्याच्याच बायकोवरच बलात्कार झाला तर सरकारची कानठाळी उघडेल काय? हा मुद्दा व्यवस्थित मांडता आला असता परंतु भारतीची भाषा आणि अंगविक्षेप वेगळा होता. यावर पैसे पण उधळले गेले. यावरही कडाडून टीका होत आहे.
वादग्रस्त विधानानंतर कव्वाली गायिका अंजली भारती यांनी फेसबुकवर व्हिडिओ टाकत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या भाषणातील ‘तो’ शब्द अनावधानाने आल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे. एका प्रबोधनपर कार्यक्रमात बोलताना ओघाओघात चुकीचे शब्द वापरले गेले, जे कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नव्हते, असे स्पष्टीकरण अंजली भारती यांनी दिले आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता, कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी, हीच आपली मूळ भावना असल्याचे त्यांनी सांगितले. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मुलगी असून महिलांचा अपमान करणे माझ्या संस्कारात नाही,” असे म्हणत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. केवळ एका चुकीच्या वाक्यावरून आपल्याला टार्गेट केले जात असून, महिला सुरक्षेच्या मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अंजली भारती यांना धमकीचे फोन आले. अश्लिल शिवीगाळ केली. जे तू बोलत आहेस तेच आम्ही तुझ्या सोबत करु. अंजली भारती म्हणाल्या की, मी मरणाला भीत नाही पण तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की मी चुकीची आहे तर मला फाशीची शिक्षा द्या, मला ती मंजूर आहे. पण माझा आवाज दाबण्याचं काम जर तुम्ही करणार असाल तर जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत माझा आवाज दबणार नाही. तुम्ही माझ्यावर केस करा, माझे प्रोग्राम बंद करा? पण तरीही माझा आवाज बंद होणार नाही. जिथं-जिथं महिलांवर अन्याय अत्याचार होतील तिथं-तिथं ही अंजली भारती उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात जर माझं काही बरं वाईट झालं तर त्याला हेच धमक्या देणारे जबाबदार असतील. अंजली भारती एक विद्रोही गायिका आहे. ती कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना भीक घालीत नाही. ती आक्रमक आहे. तिची अनेक गाणी अश्लिल शब्दांनी भरलेली असली तरी तिच्या चुकीच्या गोष्टींचे समर्थन करता येणार नाही.
बारामती नगर परिषदेच्या वतीने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाई फेकल्याची घटना घडली.प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती नगर परिषदेमध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. मात्र, संविधानाचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कार्यक्रमस्थळी न ठेवल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. “संविधानामुळेच प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, आणि त्या संविधानाच्या निर्मात्यालाच डावलले जाते, ही बाब अत्यंत दुर्दैवी व अपमानास्पद आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर आज मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी बारामती नगरपालिकेसमोर एकत्र जमले. हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन त्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. “बाबासाहेबांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही,” “नगर परिषदेने जाहीर माफी मागावी,” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. अशीच घटना धाराशिव जिल्ह्यात घडली. मुरुम नगर परिषदेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवला नसल्याने संताप व्यक्त करीत मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्यावरही शाईफेक करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पारडी या गावात प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायतच्या ध्वजारोहण कार्यक्रमावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवला नसल्याने आंबेडकरी अनुयायांनी ठिय्या आंदोलन केले. ग्रामसेवकास निलंबित करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
वर्तमानातील या सर्व नोंदी मानवी मनाला अस्वस्थ करणाऱ्या अशाच आहेत. दादा गेले पण लोकांच्या मनात अनेक आठवणी आहेत. तसेच विरोधकांकडे मुद्देही आहेत. सोशल मीडियावर धरण आणि अजित पवार तसेच सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा आणि अजित पवार यासंबंधीही टीका टिप्पणी केली जात आहे. माणूस गेल्यावर त्याच्याबद्दल चांगलंच बोलण्याची आपली संस्कृती आहे. तसेच लोकांना हा अपघात घातपात वाटतो. संजय राऊतांना सिंचन घोटाळ्याची चौकशी रद्द करुन ते आरोप मागे घेतले तर घरी श्रद्धांजली ठरेल असे वाटते तर ममता बॅनर्जी किंवा अखिलेश यादव यासारख्यांना हा घातपात असल्याने या अपघाताची सखोल चौकशी व्हावी असे वाटते. अनेक जणांच्या शंकेची सुई भाजपावर आहे तर काहींच्या डोळ्यात शरद पवार आहेत. चौकशी तर होईल आणि खरे काय ते बाहेर येईलच मात्र राजकारणात काहीही घडू शकतं हे सत्यच आहे. नाशकात घडलेली घटनाही अस्वस्थ करणारीच आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नसल्याने महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाली. वंचितचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली. अंजली भारती या गायिकेने अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद तेरा दिवसांनी उमटले. अजितदादांचा अपघात वगळता बाकीच्या सर्व घटना जातीयवादाचे समर्थन करणाऱ्या आहेत. या घटनांच्या केंद्रस्थानी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे त्यांचा, भारतीय संविधानाचा नेहमीच अपमान होतो आहे. हे केवळ जातीयवादातून होत असल्याबाबतची मानसिकता आंबेडकरी अनुयायांमध्ये आहे. या घटना दोन तीन दिवसांतच घडलेल्या आहेत. लोकांमध्ये दांडगे सामंजस्य, एकमेकांप्रती आदर, लोकसमन्वय निर्माण झाला तर सामाजिक सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल. हे सशक्त सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.
– प्रज्ञाधर ढवळे , नांदेड.
मो. ९८९०२४७९५३
Post Views: 88
