![]()
शहराच्या विकास कामांमध्ये अजित पवारांनी नेहमी मालेगाव शहराला झुकते माप दिले होते. मुस्लिम समाजाच्या धार्मिकस्थळांना सोलर सिस्टीम बसविण्यासाठी विशेष परिपत्रक जारी केले होते. परिपत्रक जारी होताच सर्वप्रथम शहरातील शंभरहून अधिक मशिदी, मदरसे, दर्गा यांना सोलरसाठी पाच कोटीचा निधी दिला होता. महापालिका निवडणुकीचा आचारसंहिता जाहीर होण्याच्या एक दिवसापूर्वी हजार खोली भागातील गोल गार्डन उभारणीसाठी दीड कोटीचा निधी मंजूर केला होता. माजी आमदार रशीद शेख व आसिफ शेख यांच्याशी अजित पवारांचा कौटूंबिक सलोखा होता. पक्षात असताना व पक्ष सोडल्यानंतरही त्यांचे संबंध कायम राहिले होते. धार्मिकस्थळांना वीज बिलांचा खर्च परवडत नसल्याने आसिफ शेख यांनी पवारांकडे सोलर सिस्टीमसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. ही मागणी तत्काळ मान्य करत सोलारसाठी डॉ. जाकिर हुसैन योजनेचे परिपत्रक काढले होते. योजना लागू करुन राज्यात पाच कोटीचा पहिला निधी मालेगावच्या धार्मिकस्थळांचा उपलब्ध करुन दिला होता. रशीद शेख यांच्या निधनानंतर त्यांचे नावे स्टडी सेंटर उभारणीसाठी देखील निधी मंजूर केला होता. सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. मनपा निवडणुकीपूर्वी गोल गार्डनसाठी दीड कोटीचा निधी मंजूर केला होता. सर्वांना समान न्याय देणाऱ्या अजित पवारांचा मृत्यू चटका लावून गेला आहे. प्रतिनिधी | दिंडोरी कादवा सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण साखर उद्योगावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांनी कादवा सहकारी साखर कारखान्याच्या अडीअडचणीच्या काळात नेहमीच खंबीर साथ दिली होती. कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्याशी त्यांचे असलेले स्नेहाचे संबंध आणि कारखान्याच्या प्रगतीसाठी त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यामुळे कादवा आज नाशिक जिल्ह्यातील एक आदर्श कारखाना म्हणून ओळखला जातो. कारखान्याच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. उसाला योग्य भाव आणि वेळेवर एफआरपी मिळावा, यासाठी त्यांनी कठोर धोरणे आखली होती, ज्याचा थेट फायदा कादवाच्या हजारो ऊस उत्पादक सभासदांना झाला. सहकार टिकला तरच शेतकरी टिकेल, या भावनेतून त्यांनी साखर उद्योगासाठी विशेष निधीची तरतूद केली होती. त्यांच्या जाण्याने कादवा कारखान्याच्या चाकाला गती देणारे ‘इंजिन’ आज थांबले असल्याची भावना शेतकरी व कामगारांमधून व्यक्त होत आहे. प्रतिनिधी | पिंपळगाव बसवंत उपमुख्यमंत्री अजीत दादा पवार यांचे पिंपळगावशी विशेष नाते होते. आमदार दिलीप बनकर हे पवारांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांनी या तालुक्यास मागील कार्यकाळात सुमारे १५०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. महिन्यापूर्वी नगर परिषदेच्या निवडणुकीत अखेरची सभा अजित पवारांनी पिंपळगाव मध्येच घेतली होती. मात्र अजित पवार यांच्या या अचानक जाण्याने पिंपळगावकरांना धक्का बसला आहे.
साेलार सिस्टीमसाठी दिला पाच काेटींचा निधी, ‘कादवा’चा आधारवड हरपला:मालेगावच्या विकासात अजितपवार यांचे माेठे याेगदान
