हिंगोलीच्या शाळांचा कायापालट:पंजाबच्या महिला सरपंचांचे पथक भारावले, जिल्ह्याचा अभ्यास दौरा उत्साहात




लोकसहभागातून शाळेचा झालेला कायापालट, शाळेची वाढती गुणवत्ता पाहून पंजाब राज्यातील महिला सरपंचांचे शिष्टमंडळ भारावून गेले. यावेळी त्यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधला तसेच ग्रामपंचायतची कामकाज व कामे पाहून कौतूक केले. पंजाब राज्यातील महिला सरपंचांचे पथक हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. या पथकामध्ये 45 महिला सरपंच असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती कामकाजाची पाहणी करून माहिती घेतली जात आहे. या शिवाय शाळा, अंगणवाडी केंद्रांनाही भेटी दिल्या जाणार असून गावात शासकिय योजनांच्या माध्यमातून केली जाणारी कामे, लोकसहभागातून केली जाणारी कामे याची माहितीही घेतली जाणार आहे. ता. 1 फेब्रुवारी पर्यंत हे पथक जिल्ह्यात पाहणी करणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, आज या पथकाने औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक सुनील मुळे, गावकरी बापुराव घोंगडे यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी गावकरी घोंगडे यांनी या पथकाला लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी, वृक्षलागवड, मैदानाची साफसफाई केल्याचे सांगितले. सदर सर्व कामे गावकऱ्यांनी श्रमदान करून केल्याचेही त्यांनी सांगितले. तर शाळेसाठी दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेल्या दोडल परिवाराने सुमारे दोन ते अडीच एकर जागा दिल्याचेही त्यांनी सांगितले. या शिवाय शाळेतील गुणवत्तेबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांनी माहिती दिली. शाळेसाठी गावकऱ्यांनी दिलेला लोकसहभाग, शाळेची गुणवत्ता पाहून महिला सरपंचाचे पथक भारावून गेले. यावेळी गावातील कामे पाहून त्यांनी गावकऱ्यांचे कौतूक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *