अजित पवारांचा शेवटचा कॉल:अपघात होण्याआधीच फोनवर बोललो, आवाज अजूनही कानात घुमतोय- राणाजगजितसिंह पाटील




राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असून संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मुंबईहून बारामती येथे आले होते. बारामती विमानतळावर लँड होण्यापूर्वीच विमानाचा भीषण अपघात झाला. दरम्यान, अजित पवारांचा शेवटचा कॉल हा भाजप आमदार आणि त्यांचा भाचा राणाजगजित सिंह पाटील यांना केला होता. विमानात बसण्यापूर्वी या दोघांमध्ये बोलणे झाले होते. तसेच बारामतीमध्ये उतरल्यावर उर्वरित बोलणे होणार असल्याची माहिती राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे. भाचा म्हणून नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहायला शिकवणारे व्यक्तिमत्व आज आपल्यापासून निघून गेले आहे, ही जाणीव अक्षरशः मन पोखरून टाकणारी आहे. लहानपणापासून राजकारण, समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून शिकवला. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणे, निर्णय घेताना लोकहित डोळ्यांसमोर ठेवणे हे सगळे त्यांच्या सहवासातून नेहमीच शिकायला मिळाले. व्यक्तिगत नात्यातील मायेपलीकडे, ते माझ्यासाठी कायम एक आदर्श आणि प्रेरणास्थान राहिले. आवाज अजूनही कानात घुमतोय पुढे बोलताना राणाजगजितसिंह म्हणाले, मन अक्षरशः सुन्न आहे. अपघात होण्याच्या काही वेळ आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता. नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतो आहे. आणि अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली त्या क्षणी काय वाटले, ते शब्दांत मांडणे खूप कठीण आहे. क्षणार्धात आयुष्य कसे संपून जाते, याची ही भीषण जाणीव प्रचंड त्रासदायक आहे. व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे, माझ्यासाठी ते कायम मार्गदर्शक आणि एक भक्कम आधार होते. त्या शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करीत आहे, अजूनही विश्वास बसत नाही, अजितकाका सोडून गेले हे स्वीकार करणे अजूनही शक्य होत नाही. संपूर्ण राज्याचे मोठे नुकसान या घटनेने केवळ आमच्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. कृतिशील, अनुभवी, लोकहितासाठी झटणाऱ्या नेतृत्वापासून वंचित झाल्याची जाणीव अधिक तीव्र होत आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी एकरूप होऊन काम करणारा नेता हरपल्याचे दुःख राज्याला दीर्घकाळ जाणवत राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे, असेही राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *