C-TET परीक्षा की इलेक्शन ड्युटी?:जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षक अडचणीत, दोन्ही एकाच वेळी आल्याने संभ्रम




राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी यामुळे शिक्षक वर्गासमोर एक मोठा पेच निर्माण झाला आहे. 7 आणि 8 तारखेला होणारी देशव्यापी C-TET परीक्षा आणि याच काळात आलेली निवडणूक ड्युटी एकाच वेळी आल्याने शिक्षकांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली परीक्षा द्यायची की शासकीय आदेशानुसार निवडणूक ड्युटी पार पाडायची, अशा दुहेरी संकटामुळे शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षकांसाठी ही महत्त्वाची परीक्षा असल्याने या परीक्षेला बहुतांश शिक्षक बसलेले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने इलेक्शन ड्यूटीसाठी जावे लागणार की रद्द होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच 3 तारखेला केंद्रप्रमुख परीक्षा आहे व 7 आणि 8 तारखेला C-TET परीक्षा आहे. दोन्ही परीक्षांचे केंद्र हे जिल्ह्याच्या बाहेर असणार आहेत आणि परीक्षेची वेळ सकाळी 8 वाजताची आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्याचा मोठा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन बदलामुळे आता 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, मतमोजणीची प्रक्रिया 7 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होईल. या अनपेक्षित बदलामुळे निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनात मोठी उलथापालथ झाली आहे. निवडणुकांच्या या सुधारित वेळापत्रकामुळे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मात्र मोठ्या कात्रीत सापडले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि निवडणुकीचे कर्तव्य एकाच वेळी आल्याने शिक्षकांसमोर गंभीर पेच निर्माण झाला आहे. नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ आता या निवडणुकांच्या ड्युटीमुळे आधीच थकलेल्या शिक्षकांना दोन्ही ‘अत्यावश्यक सेवा’ सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. कामाचा वाढता ताण आणि कर्तव्यात कसूर झाल्यास नोकरीवर गदा येण्याची भीती यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होत असून, नेमके प्राधान्य कशाला द्यावे या विवंचनेत शिक्षक अडकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *