डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणारी टोळी जेरबंद:चालकच सूत्रधार, छत्रपती संभाजीनगरचे चार आरोपी अटक




ऊरूळी कांचन परिसरात एका डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरूळी कांचन पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली कार आणि खंडणीची रक्कम असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. याप्रकरणी ऊरूळी कांचन पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम १४०(२), १४०(३), १२६(२), १२७(२) सह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी डॉ. विठ्ठल किसन चौधरी (वय ५८, व्यवसाय डॉक्टर, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) हे १० जानेवारी रोजी रात्री सोलापूर–पुणे महामार्गाने आपल्या कारने घरी जात होते. इनामदार वस्ती परिसरात पांढऱ्या रंगाच्या इरटीगा कारने त्यांच्या वाहनाला अडवण्यात आले. त्यानंतर चार आरोपी डॉक्टरांच्या कारमध्ये जबरदस्तीने बसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून डॉक्टरांचे अपहरण केले आणि त्यांना मारहाण केली. आरोपींनी डॉक्टरांना शिंदवणे परिसरात नेऊन ४ लाख रुपयांची खंडणी घेतली आणि त्यांना चौफुला येथे सोडून दिले. त्यानंतर आणखी १५ लाख रुपयांची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या डॉक्टरांनी १२ जानेवारी रोजी १५ लाख रुपये दिले. अशा प्रकारे एकूण १९ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरूळी कांचन पोलीस ठाण्याची दोन पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान डॉक्टरांचा ड्रायव्हर राजेंद्र छगन राजगुरु याच्यावर संशय बळावला. चौकशीत त्यानेच साथीदारांच्या मदतीने अपहरण आणि खंडणीचा कट रचल्याची कबुली दिली. त्यानुसार संतोष बनकर (वय ३६, रा. अनंतपूर, पैठण, संभाजीनगर), दत्ता ऊर्फ गोटू आहेर (वय ३४, रा. अनंतपूर, पैठण, संभाजीनगर) आणि सुनील ऊर्फ सोनू मगर (वय ३०, रा. गारखेडा, संभाजीनगर) या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून पांढऱ्या रंगाची इरटीगा कार (किंमत ८ लाख रुपये) आणि ७ लाख ८० हजार रुपयांची खंडणीची रक्कम असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुनील मगर याच्यावर यापूर्वी मालमत्ता चोरीचे तीन गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरूळी कांचन पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *