![]()
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अंबरनाथ नगरपालिकेतील घडामोडींवर कठोर भूमिका घेत पक्षशिस्तीचा मोठा निर्णय घेतला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उमेदवार लढवून निवडून आले असतानाही भाजपच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचा
.
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत पत्रानुसार, अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर लढलेले बारा नगरसेवक निवडून आले. मात्र, पक्षाच्या प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता या नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांतून समोर आले. ही बाब अत्यंत गंभीर, चुकीची आणि पक्षशिस्तीचा भंग करणारी असल्याचे प्रदेश काँग्रेसने स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे.
काँग्रेसच्या पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, स्थानिक पातळीवर कोणतेही आघाडी किंवा गटबंधन करताना प्रदेश किंवा वरिष्ठ नेतृत्वाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, अंबरनाथ नगरपालिकेच्या बाबतीत ही प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आली. परिणामी, पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत अशी राजकीय भूमिका घेतल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षासाठी ही बाब केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित नसून, पक्षाच्या धोरणात्मक आणि वैचारिक भूमिकेवर आघात करणारी असल्याचेही पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने कठोर भूमिका घेत अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना तात्काळ काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. यासोबतच, त्यांची ब्लॉक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या नेतृत्वावर कारवाई करून काँग्रेसने खालीपर्यंत कडक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
इतकेच नव्हे, तर या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर नगरसेवकांनाही पक्षाने गंभीर इशारा दिला आहे. भाजपसोबत गटबंधन करून पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांवरही काँग्रेस पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अंबरनाथमधील काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रदीप पाटील 12 नगरसेवकांसह भाजप प्रवेश करणार
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे आपल्या 12 नगरसेवकांसह लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश होत असल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अंबरनाथमधील काँग्रेसची ताकद यामुळे लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक पातळीवरील युतीची माहिती दिली होती
या निर्णयामागील कारणे स्पष्ट करताना प्रदीप पाटील यांनी काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ब्लॉक अध्यक्ष पदासाठी माझ्याकडे थेट एक कोटी रुपयांची मागणी केली, असा खळबळजनक आरोप पाटील यांनी केला. तसेच, स्थानिक पातळीवरील युती आणि राजकीय परिस्थितीबाबत आपण आधीच प्रदेश नेतृत्वाला माहिती दिली होती, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसकडून आपल्यावर करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा दावा करत पाटील म्हणाले की, महापालिका निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसने एकदाही आमच्याशी चर्चा केली नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो आहोत, असा ठाम दावा त्यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
