आम्हाला भाजपमुक्त राम हवा- उद्धव ठाकरे:नागपुरात उबाठातर्फे रामरक्षा पठण, महाआरती




अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. आम्ही “जय श्रीराम’ जरूर म्हणतो, पण आम्हाला आता “भाजपमुक्त राम’ पाहिजे. प्रभू श्रीराम ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, असा प्रहार उद्धव ठाकरे यांनी केला. नागपूरच्या रामनगर येथील श्रीराम मंदिरात शनिवारी १८ जुलैला उबाठा शिवसेनेतर्फे रामरक्षा पठण आणि महाआरतीचे आयोजन केले होते. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. या आंदोलनात उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेणार देशात नीट परीक्षा पेपरफुटीच्या घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. देशातील तरुणांच्या भवितव्याशी हा क्रूर खेळ सुरू आहे. असे असताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना नेमके काय सोने चिकटले आहे? सरकार आणखी किती विद्यार्थ्यांचे बळी गेल्यावर त्यांचा राजीनामा घेणार? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी शनिवारी १८ जुलैला नागपुरात केला. नागपुरातील रामनगर येथील राम मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या “रामरक्षा पठण’ आंदोलनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर उतरताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. उपोषण मोडीत काढणे लज्जास्पद सोनम वांगचुक हे देशातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार झाले आहेत. उच्च न्यायालयानेही त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. अशा वेळी सरकारने त्यांच्याशी साधी चर्चा करण्याचीही दानत दाखवली नाही. त्यांचे उपोषण अशा प्रकारे दडपशाहीने मोडीत काढणे अत्यंत लज्जास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *