रस्ता-पाणी नाही, मग मतदान कोणाला?:बंगला तांडा ग्रामस्थांचा जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून सर्वत्र उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र पैठण तालुक्यातील बिडकीन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बंगला तांडा येथील ग्रामस्थांनी जीवनावश्यक व भौतिक सुविधांकडे शासन व प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

बिडकीन ग्रामपंचायत हद्दीत बंगला तांडा, बन्नी तांडा, मेहेरबान नाईक तांडा, फारोळा तांडा आदी गावे येतात. ही बहुतांशी बंजारा समाजाची वस्ती असलेली गावे असून त्यापैकी बंगला तांडा हे गाव 1960 पासून अस्तित्वात आहे. असे असतानाही आजतागायत मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, गावातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर असून सध्या फक्त एकच बोअरवेल आहे. त्या बोअरवेलमधील पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती पंचायत समितीला वेळोवेळी देण्यात आली आहे. तसेच गावासाठी मुख्य रस्त्याची सुविधा उपलब्ध नाही. सध्या जो रस्ता वापरात आहे, तो खासगी मालमत्तेतून जात असून याबाबत अनेक वेळा शासनदरबारी पत्रव्यवहार व आंदोलने करूनही रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. याशिवाय गावात स्मशानभूमी असली तरी तेथे स्वच्छतेचा अभाव असून स्मशानभूमीला अद्याप गेट बसवण्यात आलेले नाही. तसेच गावठाण विस्ताराचा प्रश्न देखील प्रलंबित आहे. आंदोलनानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली, मात्र ती प्रत्यक्षात पाळली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या सर्व प्रश्नांकडे शासन व प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आणि कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. या निवेदनावर अक्षय चव्हाण, संदीप राठोड, संजय पवार, ऋषिकेश राठोड, आदित्य राठोड, विशाल राठोड, संदेश पवार आदी ग्रामस्थांच्या सह्या असून निवेदनाच्या प्रती आमदार विलास बापू भुमरे तसेच तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *