सोलापूरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र:जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धनुष्यबाण अन् मशाल यांची युती, राजकीय वर्तुळात खळबळ




“राज्यातील सध्याचे राजकारण शिसारी आणणारे आहे,” असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच केले होते. या विधानाचा जिवंत प्रत्यय सध्या सोलापूरच्या बार्शी तालुक्यात पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने बार्शीत चक्क दोन्ही शिवसेना (एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट) एकत्र आल्या आहेत. इतकेच नव्हे तर, त्यांच्यासोबत दोन्ही राष्ट्रवादींनीही हातमिळवणी केल्याने बार्शीत एक ‘अजब’ महाआघाडी आकाराला आली आहे. नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीदरम्यान काही धक्कादायक युती पाहायला मिळाल्या आहेत. अंबरनाथ नगर पालिकामध्ये भाजप आणि काँग्रेसने हातमिळवणी केली होती. पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजप विरोधात एकत्र लढताना दिसले. इतर काही ठिकाणी भाजप आणि एमआयएमचीही छुपी किंवा उघड आघाडी झाल्याची चर्चा आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादींचे ‘फ्यूजन’ पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या आमदाराने केले आघाडीचे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाआघाडी झाल्याचे आपल्या सोशल मीडियावर जाहीर केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या एका पत्रकाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या पत्रकात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, “जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बार्शी तालुक्यात शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मित्र पक्षांच्या वतीने ‘महाआघाडी’ करण्यात आली आहे.” मशाल आणि धनुष्यबाण: एकाच पत्रकावर! या मेळाव्यासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रकावर जे पाहायला मिळाले, त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. या पत्रकावर शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ आणि ‘मशाल’ ही दोन्ही चिन्हे शेजारी-शेजारी छापण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, एकाच बॅनरवर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो एकत्र झळकत आहेत. राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जाणारे हे नेते बार्शीत मात्र ‘महाआघाडी’च्या नावाखाली एकत्र आल्याचे चित्र आहे. भास्कर जाधवांच्या आवाहनानंतर हालचालींना वेग? शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नुकतेच एकनाथ शिंदे यांना आवाहन केले होते की, “हिंमत असेल तर मुंबईत उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊन दाखवा.” तसेच परभणीचे खासदार संजय जाधव यांनीही दोन्ही शिवसेना पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर बार्शीत झालेली ही हातमिळवणी म्हणजे दोन्ही शिवसेना पक्षांमधील ‘पुनर्मिलन’ आहे की केवळ स्थानिक सोयीचे राजकारण? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *