'उडान'च्या पुढील टप्प्यात 28,840 कोटींची गुंतवणूक:दहा वर्षांत चार कोटी नवे प्रवासी; 120 ठिकाणे जोडणार – मंत्री मुरलीधर मोहोळ




केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घोषणा केली आहे की, प्रादेशिक हवाई संपर्क योजना ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत २०२६-२७ ते २०३५-३६ या कालावधीत सुमारे २८,८४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. या गुंतवणुकीमुळे पुढील दहा वर्षांत सुमारे चार कोटी नव्या प्रवाशांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, १२० नवीन ठिकाणांना हवाई सेवेशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. मोहोळ यांनी ‘उडान’च्या पुढील टप्प्याची प्रभावी, वेळेत आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे, भारतीय विमानतळ प्राधिकरण, डीजीसीए, विमान कंपन्या, विमानतळ संचालक आणि इतर सर्व संबंधित भागधारकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. पुणे येथे आयोजित ‘उडान’च्या पुढील टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राममोहन नायडू, नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, विविध राज्य सरकारांचे प्रतिनिधी, विमान कंपन्या, विमानतळ संचालक तसेच नागरी उड्डयन क्षेत्रातील विविध भागधारक उपस्थित होते. ‘उडान’च्या पुढील टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक नियोजन, समन्वय आणि कृती आराखड्याबाबत या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली. मोहोळ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेली ‘उडान’ योजना ही देशातील सामान्य नागरिकांपर्यंत हवाई प्रवास पोहोचविणारी परिवर्तनकारी योजना ठरली आहे. “हवाई चप्पल घालणारा नागरिकही हवाई प्रवास करू शकला पाहिजे” हा पंतप्रधानांचा संकल्प या योजनेने प्रत्यक्षात उतरवला आहे. आज देशातील लहान शहरे, दुर्गम भाग, सीमावर्ती प्रदेश आणि आकांक्षी जिल्हे हवाई संपर्काच्या मुख्य प्रवाहात आले असून पर्यटन, व्यापार, आरोग्यसेवा, शिक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाली आहे. आतापर्यंत ‘उडान’ अंतर्गत देशभरात ६७० हून अधिक प्रादेशिक मार्ग कार्यान्वित करण्यात आले असून ९५ विमानतळ, हेलिपोर्ट आणि वॉटर एअरोड्रोम राष्ट्रीय हवाई नेटवर्कशी जोडले गेले आहेत. या मार्गांवर ३.४० लाखांहून अधिक उड्डाणे संचालित झाली असून १.७० कोटींहून अधिक प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या मार्गांची आर्थिक व्यवहार्यता टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ४,५०० कोटी रुपयांहून अधिक व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) उपलब्ध करून दिली आहे. ‘उडान यात्री कॅफे’ सारख्या उपक्रमांमुळे हवाई प्रवास अधिक सुलभ आणि प्रवासी-केंद्रित बनविण्यात आला आहे. पंतप्रधान यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत २०२६-२७ ते २०३५-३६ या कालावधीत सुमारे २८,८४० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या टप्प्यात १२० नवीन ठिकाणांना हवाई सेवेशी जोडण्याचे उद्दिष्ट असून पुढील दहा वर्षांत सुमारे चार कोटी नव्या प्रवाशांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय १०० नवीन विमानतळांचा विकास, ४४१ एअरोड्रोमना कार्यान्वयनासाठी सहाय्य, दुर्गम भागात २०० आधुनिक हेलिपॅडची उभारणी आणि प्रादेशिक मार्गांसाठी मोठ्या प्रमाणावर व्हायबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद करण्यात आली आहे. मोहोळ यांनी सांगितले की, गेल्या दशकात भारताच्या नागरी उड्डयन क्षेत्राने अभूतपूर्व प्रगती केली आहे. २०१४ मध्ये देशात कार्यरत असलेल्या ७४ विमानतळांची संख्या आज १६० हून अधिक झाली आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ बनला असून प्रवासी संख्या, विमान ताफा, हरित विमानतळ, डिजी यात्रा, एमआरओ क्षेत्रातील सुधारणा आणि डिजिटल उपक्रमांमुळे भारतीय नागरी उड्डयन क्षेत्र जागतिक स्तरावर वेगाने पुढे जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *