भाजपचा एकनाथ शिंदेंवर प्रचंड दबाव:आता ठाण्याच्या महापौर पदावरही सांगितला दावा; आमदार निरंजन डावखरे यांनी टाकला डाव




मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार? या मुद्यावरून भाजप व शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाने भाजपपुढे अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने आता थेट शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याच्या महापौरपदावर दावा सांगितला आहे. भाजपच्या या राजकीय खेळीमुळे शिंदे गटाची मोठी अडचण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत ठाणे महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बहुमत आहे. पण सत्ता राखण्यासाठी त्यांना भाजपची साथ महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्याच्या महापौर पदावर दावा सांगितला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला बहुमत मिळाले. पण आमचाही सन्मान झाला पाहिजे. भाजपने शीळ ते वडवली या पट्ट्यात अत्यंत प्रभावी कामगिरी केली. आमच्या वाट्याला ज्या जागा आल्या, तिथे आम्ही 100 टक्के स्ट्राईक रेट राखला. आता आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे ठाण्याचा महापौर भाजपचा असावा अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. ठाणे महापालिकेत भाजपला किमान 2 वर्षांसाठी महापौरपद मिळावे. अन्यथा आम्ही सत्तेत न राहता विरोधी बाकावर बसणे पसंत करू, असा इशारा निरंजन डावखरे यांनी दिला आहे. शिंदे गटाच्या मुंबईतील राजकीय दबावतंत्राला उत्तर म्हणून डावखरेंनी ठाण्यात हा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ठाकरे – फडणवीसांत दूरध्वनीवरून चर्चा दुसरीकडे, भाजपने मुंबईच्या महापौरपदाच्या मुद्यावर ठाकरे गटाशी बोलणी सुरू केल्याचाही दावा केला जात आहे. शिंदेंच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे. पण तूर्त भाजप आमदार प्रवीण दरेकर व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा दावा फेटाळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने 2017 साली ठाकरे गटाचा महापौर व्हावा म्हणून महापौरपदाच्या निवडणुकीवेळी गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला होता. या मदतीची कथित परतफेड म्हणून ठाकरे गट यंदा महापौरपदाच्या निवडणुकीवेळी गैरहजर राहून भाजपची मदत करेल. पण भाजप व ठाकरे गटाने ही शक्यता फेटाळल्याने यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा दुसरीकडे, ठाकरे गटाने मुंबईच्या महापौरपदावरून भाजपवर निशाणा साधला आहे. ज्या दिवशी मुंबईत भाजपचा महापौर बसेल, त्या दिवशी संपूर्ण मुंबई शोकसागरात बुडेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत भाजपचा महापौर बसवण्यासंबंधी केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. मोदींचे भाषण लिहिणाऱ्यांचा इतिहास कच्चा आहे. मुंबीत फक्त शिवसेना आहे व राहील. मुंबईकरांनी जे आकडे दिलेत, त्यावरून भाजपचा विजय झाला नसल्याचे स्पष्ट होते. मोदींनी आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत. संजय राऊत यांनी यावेळी एकनाथ शिंदेंचा यांचा उल्लेख उपरोधिकपणे लोहपुरुष म्हणूनही केला. एकनाथ शिंदे हे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अमित शहा त्यांना खांद्यावर घेऊन फिरतात, पण शिंदेंची चावी नक्की कुणाकडे आहे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *