![]()
छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एमआयएमवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एमआयएम धर्माच्या नावाखाली समाजात फूट पाडून मते मागत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. दिव्य मराठीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एमआयएम केवळ जाती-धर्माचे विष पसरवून लोकांमध्ये द्वेष निर्माण करत आहे. काँग्रेस पक्ष लोकांना जोडण्याचे काम करतो, तर एमआयएम एकमेकांविरोधात बोलून तोडण्याचे काम करते. धर्माच्या नावाखाली मते मागून ते लोकांची दिशाभूल करत आहेत.
अकोटमध्ये भाजपसोबत जाऊन एमआयएमने ते कोणासोबत आहेत हे दाखवून दिले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी नमूद केले. सपकाळ यांच्या हस्ते युसुफ शेख यांचे पुत्र शेख सलीम यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष खासदार कल्याण काळे, युसुफ शेख, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, माजी आमदार एम.एम. शेख, जितेंद्र देहाडे, कृष्णा बनकर, सविता सालापुरे, शेख सलीम आणि अस्मा खान यांची उपस्थिती होती.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे सांगितले की, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि त्याने कधीही कुठल्याही जाती-धर्माचा पुरस्कार केला नाही. याउलट, भाजप आणि एमआयएम जाती-धर्मात फूट पाडून द्वेष पसरवत आहेत.
हा देश सर्वांचा आहे. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ईसाई अशा सर्व जाती-धर्माच्या लोकांचा आहे. मात्र, एमआयएम द्वेष पसरवून जातीय आणि धार्मिक प्रचार करत आहे. त्यांना केवळ तोडफोड हवी आहे, तर काँग्रेस प्रेमाचा संदेश देत असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
