Lakshman Hake Predicts Pawar Family Reunion Ministers Slams Ajit Pawar Criminals | निवडणुकांनंतर सुप्रिया सुळे केंद्रात, तर रोहित पवार राज्यात मंत्री: शरद पवारांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल – Maharashtra News



“राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागताच महाराष्ट्राला एक वेगळेच चित्र पाहायला मिळेल. निवडणूक संपल्यानंतर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, तर रोहित पवार राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील. पवार कुटुंब कधीच वेगळे नव्हते आणि नाहीत

.

अजित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करताना लक्ष्मण हाके यांनी पुण्याच्या राजकारणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “एकीकडे मुखी फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे तिकीट वाटताना बोडके, आंदेकर, नायर यांसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना जवळ करायचे, हेच अजित पवारांचे राजकारण आहे. पुण्यात सत्ता आल्यावर अजित पवार पुन्हा पहाटे बाहेर पडतील, मोकळे भूखंड शोधतील आणि ते ५०० रुपयांत हडप करतील.” पवार हे भ्रष्टाचाराचे महामेरू असून ते जनतेचे सेवक नसून अदानींसारखे केवळ एक ‘उद्योजक’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

शरद पवारांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे

शरद पवार यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना हाके म्हणाले, “शरद पवार वरवर भाजपसोबत जाणार नाही असे सांगत असले, तरी त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. ते राज्यातील भाजप नेत्यांना किंमत देत नाहीत, त्यांचे थेट ‘कनेक्शन’ पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी आहे.”

भाजपच्या ‘गंगे’त भ्रष्टाचाराची ‘गटारगंगा’

भाजपवर टीका करताना लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मुद्दा मांडला. “भाजप स्वतःला कितीही पवित्र गंगा मानत असली, तरी त्यांनी अजित पवारांसारखी ‘भ्रष्ट गटारगंगा’ पक्षात मिसळून घेतली आहे. ज्या पवारांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकांनी भाजपला निवडून दिले, त्याच पवारांना भाजपने सत्तेत भागीदार केले. यामुळे भाजपचा सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ आणि नाराज आहे,” असे लक्ष्मण हाके म्हणालेत.

राज्यात सोयीच्या युत्यांचा खेळखंडोबा

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना लक्ष्मण हाके यांनी सर्वच पक्षांच्या सोयीच्या राजकारणाचा समाचार घेतला. “सध्या भाजपची शिंदे गटाशी आणि अजित पवारांशी युती आहे. अजित पवारांचे शरद पवारांशी आतून साटेलोटे आहे. शरद पवार काँग्रेस आणि ठाकरेंसोबत आहेत. ठाकरे आणि मनसेची जवळीक आहे, तर काँग्रेस वंचितसोबत बोलणी करतेय. थोडक्यात काय, तर सर्वच पक्ष एकमेकांसोबत निवडणूक लढवत आहेत. यात सामान्य कार्यकर्ता मात्र बाजूला फेकला गेला असून, आगामी निवडणुका केवळ पैसा आणि गुंडगिरीच्या जोरावर लढल्या जातील,” अशी भीती लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *