![]()
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच वांद्रे (बांद्रा) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला
.
मिळालेल्या माहितीनुसार, हाजी सालीन कुरेशी हे बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात आपल्या समर्थकांसह घरोघरी जाऊन प्रचार करत होते. यावेळी मतदारांच्या भेटीगाठी घेत असतानाच गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे कुरेशी यांच्या पोटात धारदार चाकू खुपसला आणि तिथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुरेशी यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने जवळच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती चिंताजनक, पोलिस तपास सुरू
सध्या हाजी सालीन कुरेशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की यामागे काही वैयक्तिक कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. ‘मुंबईत महायुतीचाच विजय होईल’ असा चंग बांधून प्रचारात उतरलेल्या शिंदे गटाच्या उमेदवारावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
कोण आहे हाजी सलीम कुरेशी?
हाजी सलीम कुरेशी हे शिवसेना शिंदे गटाचे नेते असून, पूर्वी ते एमआयएम या पक्षात कार्यरत होते. मुंबई महापालिका निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनीही त्यांना उमेदवारी दिली असून, मुंबईतील प्रभाग क्रमांक ९२ मधून ते निवडणूक लढवत आहेत.
राज्यातील इतरही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना
महानगरपालिका निवडणुकीच्या या कालखंडात केवळ मुंबईच नाही, तर राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर माहोळ गावात असाच भीषण हल्ला झाला होता. राजकीय वादातून झालेल्या या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर खोलवर जखमा करण्यात आल्या होत्या. त्यांचा आज उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
याशिवाय सांगलीमध्ये एका उमेदवाराच्या आईने दडपशाहीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटनाही समोर आली आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणातील कटुता चव्हाट्यावर आली आहे. सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. बिनविरोध निवडीसाठी या उमेदवाराची हत्या करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता.
या घटनांवरून नव्या जमान्याच्या राजकारणाला ‘रक्ताचा डाग’ लागल्याचे म्हणावे लागेल.
