![]()
राज्यातील २९ शहरांमध्ये मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा उडालेला असतानाच, सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकावण्यात आल्याचा आरोप होत
.
सांगलीतील प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सोमवारी या उमेदवाराच्या आईने विष प्राशन केले. त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीकडून या उमेदवारावर उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जात होता. या त्रासाला कंटाळूनच त्यांच्या आईने हे टोकाचे पाऊल उचलले, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
रुग्णालयाबाहेर तणाव; पोलिसांचा हस्तक्षेप
या घटनेचे वृत्त समजताच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी आणि घोषणाबाजी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उमेदवाराला प्रचारापासून रोखले जातंय
या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या उषाताई जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आमच्या उमेदवाराला प्रचारापासून रोखले जात आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रचंड दबाव असून मोठी दहशत निर्माण केली जात आहे. माझ्याकडे या दडपशाहीचे ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग्स देखील उपलब्ध आहेत. जर हिंमत असेल तर समोरासमोर लढा, अशी भेकडासारखी दमदाटी करू नका,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. तसेच, सोलापूरप्रमाणेच सांगलीची जनताही या दडपशाहीला उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसने फेटाळले सर्व आरोप
दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार राजेश नाईक यांनी ठाकरे गटाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “वार्ड १६ मध्ये आमचा प्रचार शांततेत सुरू आहे. आम्ही कुणावरही दबाव टाकलेला नाही. हा सर्व प्रकार घरगुती वादातून घडला असावा, परंतु विरोधक त्याचे राजकीय भांडवल करत आहेत. संबंधित महिला आमचीही कार्यकर्ती म्हणून काम करत होती,” असे म्हणत नाईक यांनी आपली बाजू मांडली.
सांगलीतील राजकीय वर्तुळात खळबळ
महानगरपालिका निवडणूक ही स्थानिक वर्चस्वाची लढाई मानली जाते, मात्र सांगलीतील या घटनेने निवडणुकीच्या प्रचाराचा स्तर घसरल्याची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे. या घटनेमुळे सांगलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका बाजूला विकासाचे दावे केले जात असताना, दुसरीकडे उमेदवारांच्या कुटुंबीयांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागत असेल, तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
