Supriya Sule Unopposed Candidates Municipal Elections Criticism | धमकी आणि दहशतीकडे निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष चिंताजनक: संसदेत आवाज उठवणार, सुप्रिया सुळेंची ‘बिनविरोध’वरून हल्लाबोल – Pune News



महानगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट यांच्यात उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी लागलेली चढाओढ ही ‘अघोरी’ असल्याची टीका होत असून, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. र

.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, तब्बल 7 ते 8 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका होत आहेत. NOTA चा पर्याय उपलब्ध असूनही मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. यामध्ये धमकीचे प्रकार, बंदुकीच्या जोरावर दहशत, पैशांचा अतोनात वापर, उमेदवारी अर्ज माघारीसाठी विविध प्रकारचा दबाव, ब्लॅकमेलिंग, बोगस मतदान आणि मतदारांना दिली जाणारी प्रलोभने असे अनेक गंभीर प्रकार माध्यमांतून सातत्याने समोर येत असल्याचे सुळे म्हणाल्या.

हे सर्व घडत असताना निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष अधिकच चिंताजनक आहे. सुदृढ लोकशाहीसाठी हे अतिशय धोकादायक आहे. मी याबाबत यापूर्वीही संसदेत आवाज उठवला आहे, आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी पुढेही हे मुद्दे सातत्याने मांडत राहावे लागणार आहेत असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची जणू चढाओढच लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राज्यातील 69 पैकी तब्बल 68 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, या ऐतिहासिक पण वादग्रस्त घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक व्यवस्थाच संकटात सापडली असून लोकशाही प्रक्रियेऐवजी केवळ पैशाची ताकद आणि राजकीय दबावाच्या जोरावरच आता निकालांचे चित्र स्पष्ट होत असल्याचे गंभीर चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे.

विरोधकांनी या ‘बिनविरोध’ निवडीच्या प्रक्रियेला ‘अघोरी स्पर्धा’ असे संबोधत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला असून, त्यामध्ये नार्वेकर हे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची थेट धमकी देत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडूनही उमेदवारांना धमकावण्यात आल्याचे दावे केले जात आहेत. या सर्व घडामोडींमुळे निवडणुकांमधील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *