![]()
हिंगोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवासस्थानात प्रवेशासाठीचा अखेर सोमवारी ता. ५ मुहूर्त लागला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवासस्थानामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या भोजनावळीचे नियोजन झाले होते. मात्र आता त्याचा खर्च कोणी
.
हिंगोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह इतर अभियंत्यांसाठी लाखो रुपये खर्चुन निवासस्थानाचे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामासाठी आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लोटला तरी वरिष्ठ अधिकारी व अभियंते मुख्यालयी न राहता बाहेरगावाहून ये जा करीत आहेत. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत कार्यालयाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर सोपविण्यात आली होती. याबाबत कुठलेही लेखी आदेश नसले तरी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याकडून मात्र सर्व जबाबदारी चोखपणे पार पाडली जात आहे. यामध्ये कार्यालयीन कामकाजाची सविस्तर माहिती देण्यासोबतच कोणते कंत्राटदार आले होते त्यांनी काय विचारणा केली याची माहितीही या कंत्राटी कर्मचाऱ्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्याला दिली जाऊ लागली आहे.
याप्रकारामुळे वरिष्ठ अधिकारी देखील कंत्राटी कर्मचाऱ्याच्या विश्वासावर कार्यालय सोडून देत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. या प्रकारामुळे कर्मचारी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यासह कंत्राटीच्या दबावाखालीच काम करीत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, लाखो रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये अधिकाऱ्यांचा गृह प्रवेश कधी होणार याची चर्चा सुरु झाली होती. या संदर्भात सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाने निवासस्थानाच्या वास्तूशांतीचा लगोलग मुहूर्तही शोधून काढला. यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याची भुमीकाही महत्वाची होतीच.
मागील दोन दिवसांपासून या निवासस्थानाच्या परिसरात साफसफाई करण्यात आली. त्यानंतर आज निवासस्थानासमोर शामीयाना टाकून वास्तूशांतीचा कार्यक्रमही झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यथासांग पुजाही करण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भोजनावळी देखील उठविण्यात आल्या. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अधिकृत गृहप्रवेश झाला असला तरी इतर अभियंत्यांना निवासस्थानात प्रवेशासाठी कधी मुहुर्त लागणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भोजनावळीच्या खर्चाचीच चर्चा
या ठिकाणी आज झालेल्या कार्यक्रमास स्वादीष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी अभियंते व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. मात्र भोजनाचा खर्च कोणी केला याचीच चर्चा सुरु झाली आहे.
