.

निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाथर्डी तालुक्यातील मोहटे गाव आज आपल्या आगळ्यावेगळ्या परंपरेमुळे जगभर ओळखले जात आहे. ३०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या या गावात दहिफळे आडनावाच्या ग्रामस्थांकडून आजही दूध, दही, तूप किंवा खवा विकला जात नाही, ही बाब थक्क करणारी आहे.
३०० वर्षांपासून दूध विक्रीवर बंदी मोहटे गावातील ८० टक्के लोकसंख्या ‘दहिफळे’ आडनावाच्या ग्रामस्थांची आहे. निजामाच्या राजवटीत देवीच्या कृपेने गावकऱ्यांच्या म्हशींचा रंग बदलून त्या पांढऱ्या झाल्या आणि ग्रामस्थ मोठ्या संकटातून वाचले, अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून कृतज्ञता म्हणून गावकऱ्यांनी दुग्धजन्य पदार्थांची विक्री न करण्याची शपथ घेतली. आजही गावात आलेला पाहुणा उपाशी जात नाही, त्याला दुधाचा चहा किंवा पाहुणचार दिला जातो, मात्र दुधाचा व्यापार येथे वर्ज्य मानला जातो.
माहूरच्या रेणुकामातेचे अंशात्मक स्थान संत श्री बन्सीबाबा दहिफळे यांच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन माहूरच्या देवीने मोहट्याच्या गडावर दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. अश्विनी शुद्ध एकादशीला देवीचा ‘तांदळा’ प्रकट झाला आणि तेव्हापासून हे स्थान नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध झाले.
आज येथे दक्षिण भारतीय शैलीतील ६० कोटी रुपये खर्चून उभारलेले भव्य ‘श्री यंत्राकार’ मंदिर भाविकांचे डोळे दिपवते. विशेष म्हणजे, एकाच ठिकाणी दशमहाविद्या आणि ६४ योगिनींचे दर्शन होणारे हे राज्यातील एकमेव मंदिर आहे. भक्त निवास, मोफत महाप्रसाद आणि विलोभनीय निसर्ग सौंदर्याने नटलेले मोहटे गाव आजही आपल्या पूर्वजांच्या शपथेचे आणि संस्कृतीचे पालन करून संपूर्ण राज्यासमोर श्रद्धेचा एक आदर्श वस्तुपाठ सादर करत आहे.
