![]()
राज्यात सुरू असलेल्या महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजब-अद्भुत प्रकार समोर येत आहेत. प्रचार, आरोप-प्रत्यारोप आणि बंडखोरी यासोबतच आता अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या आरोपांनी निवडणूक प्रक्रियेला वेगळंच वळण दिलं आहे. राज्यातील विविध
.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबर रोजी पार पडली होती. मात्र या निवडणुकीआधीच, म्हणजे मतदानाच्या दोन दिवस आधी, प्रभाग क्रमांक 9 मधील भारत माता मतदान केंद्रासमोर संशयास्पद साहित्य आढळून आलं होतं. या साहित्याबाबत परिसरात जादूटोण्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात तसेच मतदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. मतदानाच्या अगदी तोंडावर घडलेल्या या घटनेची चर्चा संपूर्ण प्रभागात पसरली होती.
या प्रकरणावर आता शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार अमित वाहुळ यांनी थेट आरोप केले आहेत. निवडणुकीत पराभव स्वीकारताना त्यांनी आपला पराभव जादूटोण्यामुळेच झाल्याचा दावा केला आहे. अमित वाहुळ यांच्या मते, मतदान केंद्रासमोर आढळलेल्या जादूटोण्याशी संबंधित साहित्यामुळे मतदार भयभीत झाले. या भीतीपोटी अनेक मतदारांनी मतदान करण्याचा निर्णय बदलला किंवा मतदानालाच न जाण्याचा पर्याय स्वीकारला. परिणामी, याचा थेट परिणाम मतदान आणि मतमोजणीवर झाला आणि त्यातूनच आपला पराभव झाला, असा आरोप त्यांनी केला आहे.
अमित वाहुळ यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. निवडणूक ही लोकशाहीची अत्यंत पवित्र आणि पारदर्शक प्रक्रिया असताना, अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांवर मानसिक दबाव टाकण्याचा हा गंभीर प्रकार असल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्वक अशा प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण करणं हे लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
या तक्रारीनंतर आता पोलिस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, गुन्हा दाखल होणार की नाही, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. निवडणूक काळात अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्याचा सामाजिक आणि मानसिक परिणाम मतदारांवर होतो, हे लक्षात घेता या प्रकरणाचा तपास गांभीर्याने होणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जादूटोण्याच्या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेवर संशयाची छाया पडत असल्याने प्रशासनावरही दबाव वाढला आहे.
17 अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक ड्यूटीला गैरहजर
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी स्थिर सर्वेक्षण पथकात नियुक्त करण्यात आलेले 17 अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक ड्यूटीला गैरहजर राहिले. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांनी स्वतः दिलेले मोबाइल क्रमांक चुकीचे असल्याचं तपासात आढळून आलं. संबंधित कार्यालयांमार्फत संपर्क साधून त्यांना कर्तव्यास हजर राहण्याची ताकीद देण्यात आली होती. मात्र तरीही हे कर्मचारी निवडणूक कामावर रुजू झाले नाहीत.
दुसरीकडे निवडणूक ड्यूटीतील हलगर्जीपणा
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात संबंधित 17 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक ही केवळ राजकीय प्रक्रिया नसून ती प्रशासकीय जबाबदारीही आहे. अशा वेळी नियुक्त कर्मचाऱ्यांचा गैरहजरपणा हा निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. एकीकडे जादूटोण्याचे आरोप आणि दुसरीकडे निवडणूक ड्यूटीतील हलगर्जीपणा, यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील निवडणूक वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे.
