![]()
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप युतीबाबत कोणतेही चित्र स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्माण झालेला भाजप-शिवसेना युतीचा पेच आणि मुंबईच्या महापौराबाबत
.
पुण्यामध्ये युती असल्याचे उदय सामंत काल म्हणाले होते. तर आम्ही अर्ज मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा रवींद्र धंगेकर यांनी घेतला आहे. यावर उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “धंगेकर हे पक्षाची भूमिका मांडणारी व्यक्त नाही. ते महानगरप्रमुख आहेत. काल मी एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाने पुण्यात गेलो होतो. त्यावेळी मी धंगेकर आणि नीलम गोरे यांच्याशी चर्चा केलेली आहे. फॉर्म ठेवायचा की नाही, यासंदर्भातील निर्णय एकनाथ शिंदे घेतील. धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने मला देखील दिलेले नाहीत. त्यामुळे पुण्याच्या संदर्भात आमची सगळ्यांची एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा होईल. त्यानंतर निर्णय होईल.”
स्थानिक नेत्यांच्या विधाने अधिकृत मानू नका
उदय सामंत म्हणाले की, “मी काल पुण्यातही सांगितले की, युती तुटली ही एका महानगरपालिकेची बातमी महाराष्ट्रभर होऊन उपयोग नाही. आज आम्ही युती म्हणून सरकारमध्ये काम करतोय. त्यामुळे स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या रोषामुळे, माध्यमांमध्ये केली जाणारी वक्तव्ये अधिकृत मानू नये. ज्यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने भूमिका स्पष्ट करतील, तीच भूमिका पक्षाची असल्याची मानावी.”
यशस्वी युतीची चर्चा करा, वादाची नको
पुण्यातील वादावरच चर्चा होत असल्याबद्दल उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. “युती तुटली ही एका शहराची बातमी पूर्ण महाराष्ट्रात पसरवून उपयोग नाही. आपण सकारात्मक बाजूही पाहिली पाहिजे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पनवेल, कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती यशस्वी झाली आहे, असे उदय सामंत म्हणालेत.
कृपाशंकर सिंगांच्या विधानाचा तीव्र विरोध
“उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणा म्हणजे उत्तर भारतीय महापौर होईल,” असे वक्तव्य भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मिरा-भाईंदरमध्ये केले होते. यावर सामंत यांनी कडक भाषेत प्रतिक्रिया दिली. “भाजपमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर सिंग यांना दिले असतील असे मला वाटत नाही. मुंबईचा किंवा कोणत्याही पालिकेचा महापौर कोण असावा, याचे धोरण कृपाशंकर सिंग ठरवू शकत नाहीत. त्याचा निर्णय महायुतीतील सर्व प्रमुख नेते चर्चा करूनच घेतील,” असे सांगत त्यांनी हे विधान फेटाळून लावले.
