नांदेड (प्रतिनिधी) : तुळजापूर-बुटीबोरी (नागपूर) राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन वर्षही लोटले नाही, तोच नांदेड शहरालगत महामार्गाच्या दर्जाची पोलखोल होऊ लागली आहे. विष्णुपुरी येथील उड्डाणपुलाची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना ताजी असतानाच सोनखेड बसस्थानकाजवळील उड्डाणपुलाचा स्लॅब दि. १९ ऑगस्टच्या मध्यरात्री कोसळल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने घटना मध्यरात्री घडल्याने जीवितहानी टळली.
सोनखेड पुलाची चार दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. पुलात पावसाचे पाणी मुरत असल्याने दुरुस्तीचे काम सुरू असतानाच मुख्य स्लॅब कोसळल्याने तपासणी आणि बांधकामाच्या गुणवत्तेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेनंतर प्रशासनाने पुलावरील वाहतूक एका मार्गाने सुरू केली आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या महामार्गाची अवघ्या काही महिन्यांत अशी अवस्था होत असेल, तर कंत्राटदाराच्या कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. या महामार्गाचे काम के.टी.आय.एल. कंपनीकडे असल्याचे सांगण्यात येते. अवघ्या २० किलोमीटरच्या परिसरात उड्डाणपुलाशी संबंधित दोन गंभीर घटना घडल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या दर्जाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, धनेगाव परिसरात उड्डाणपुलाच्या बांधकामाला ग्रामस्थांनी सुरुवातीपासून विरोध केला होता. भिंतीऐवजी कॉलमवर आधारित पूल उभारावा, अशी त्यांची मागणी होती. यामुळे काम सुमारे सहा महिन्यांहून अधिक काळ रखडले होते. आता सोनखेडच्या घटनेनंतर ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या शंका पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.
महामार्ग नव्याने; पण प्रश्न जुनाच—‘गुणवत्तेची हमी कुठे?’ असा सवाल आता सर्वसामान्य वाहनधारकांकडून केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Post Views: 36

