![]()
देशात सध्या साखरेचे दर गगनाला भिडले असून, या दरवाढीमागे मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. देशात ऑक्टोबर अखेरपर्यंत पुरेल इतका साखरेचा साठा उपलब्ध असताना, साखरेचे दर ऐतिहासिक पातळीवर का वाढले? असा सवाल करत त्यांनी सर्व साखर कारखान्यांमधील शिल्लक साठ्याची केंद्र सरकारने तातडीने तपासणी करावी, अशी आक्रमक मागणी केली आहे. पुरेसा साठा असताना दरवाढ का? सध्याच्या साखर टंचाई आणि दरवाढीवर तीव्र प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या वर्षीचा शिल्लक साठा आणि यावर्षी उत्पादित झालेली साखर यांचा विचार केल्यास, ऑक्टोबर संपेपर्यंत पुरेल एवढा साठा केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. परिस्थिती नियंत्रणात असतानाही साखरेचे दर इतिहासात पहिल्यांदाच इतक्या वेगाने का वाढत आहेत, याचे कारण शोधणे गरजेचे आहे. गोदामांमध्ये ‘रेकॉर्डवर नसलेली’ साखर! कारखान्यांच्या गोदामांमध्ये व्यापाऱ्यांनी लपवलेला साठा असल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला आहे. “राज्यातील सर्व साखर कारखान्यांमधील शिल्लक साठ्याची तातडीने तपासणी झाली पाहिजे. ऊस वजनातील काटामारी आणि रिकव्हरी चोरीतून निर्माण झालेली साखर, तसेच साखरेचे दर कमी असताना व्यापाऱ्यांनी खरेदी करून कारखान्यांच्या गोदामातच दडवून ठेवलेली साखर सध्या कोणत्याही अधिकृत रेकॉर्डवर नाही,” असा दावा त्यांनी केला. या बेकायदेशीर आणि छुप्या साठ्याचा फायदा केवळ मूठभर कारखानदार आणि व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी आणि ग्राहकांना दुहेरी फटका या कृत्रिम दरवाढीमुळे ना शेतकऱ्यांचा फायदा होत आहे, ना ग्राहकांचा. रेकॉर्डवर नसलेल्या या साखरेच्या विक्रीतून मिळणारा जास्तीचा नफा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही. तर दुसरीकडे, सर्वसामान्य ग्राहकांना मात्र सणासुदीच्या काळात चढ्या दराने साखर खरेदी करावी लागत आहे, याकडे राजू शेट्टी यांनी लक्ष वेधले. साखर आयात केल्यास दर पुन्हा कोसळतील! साखरेचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आयात करण्याचा घाईघाईने निर्णय घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम आगामी गळीत हंगामावर होतील, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. याबाबत ते म्हणाले की, “जर सरकारने आयात केली, तर ती साखर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये भारतात पोहोचेल. नेमक्या याचवेळी देशातील नवा साखर हंगाम सुरू झालेला असतो. विदेशी साखर देशात आल्यास साखरेचे दर अचानक ३२ ते ३५ रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली कोसळतील आणि याचा सर्वात मोठा आर्थिक फटका पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच सहन करावा लागेल.” त्यामुळे आयात करण्यापूर्वी देशातील छुप्या साठ्यांचा पर्दाफाश करावा, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे. हेही वाचा.. साखर स्वस्त होऊ शकते, आयात करमुक्त झाली:दोन महिन्यांत 40% महाग, आता ₹55 प्रति किलोच्या आसपास विकली जात आहे, इराण युद्धाचा परिणाम येत्या काही दिवसांत साखर स्वस्त होऊ शकते. केंद्र सरकारने तिच्या आयातीला करमुक्त केले आहे. साखरेच्या सतत वाढणाऱ्या किमती लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. ही सवलत 31 ऑक्टोबरपर्यंत राहील. सध्या किरकोळ बाजारात साखर सुमारे ₹55 प्रति किलोने विकली जात आहे. सविस्तर वाचा
ताज्या घडामोडी :
- पाटील भगिनी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकल्या, एकाचा राज्यात 12 वा क्रमांक:दिया राज्यात 12 वी, माही जिल्ह्यात 11 वी; शिक्षणमंत्र्यांकडून सत्कार
- सुविंदर विक्कीने कधीकाळी विमा पॉलिसी विकली होती:जेवणासाठीही पैसे नव्हते; ‘आवारापन 2’ मधील भूमिकेला आपल्या आयुष्याशी जोडले
- अवघ्या २० किमीमध्ये दुसरा उड्डाणपूल हादरला; महामार्गाच्या गुणवत्तेवर संताप – VastavNEWSLive.com
- PV Sindhu; Badminton BWF World Championships 2026 Update
- साखरेच्या दरवाढीमागे नेमकं कारण काय?:कारखान्यांतील शिल्लक साठ्याची तपासणी करा, राजू शेट्टींची केंद्र सरकारकडे मागणी
- जेव्हा तुम्हाला मृतदेह बनवले जाईल, तेव्हा रडू नका:कंगनाने निळ्या ड्रमचा फोटो शेअर करत मॉडर्न डेटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले
- शेतीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; ज्ञानेश्वर जाधव, गजानन जाधव यांच्यासह आठ जणांवर गुन्हा
- Wesley So Wins 2026 Sinkfield Cup

