![]()
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून सध्या सत्ताधारी महायुती व विरोधी पक्षांमध्ये सुंदोपसुंदी माजली आहे. विशेषतः ठाकरे बंधूंनी मुंबईचा महापौर मराठीच होईल असे ठणकावून सांगत मुंबईतील मराठी जनतेला आपल्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. त्यातच एमआय
.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित होतील. यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर येथील सत्ता व महापौरपद स्वतःकडे राखण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांत कुरघोडी रंगली आहे. या पार्श्वभूमीवर वारीस पठाण यांनी उपरोक्त सवाल केला आहे.
प्रथम पाहू काय म्हणाले वारीस पठाण?
वारीस पठाण म्हणाले, मुंबईचा महापौर पठाण, शेख, सय्यद, अन्सारी का होऊ शकत नाही? संविधानात तर समानता आहे ना? सर्वांना बरोबरीचा दर्जा, हे संविधानच वाचत नाहीत. यांना काही माहितीच नाही. यांचे केवळ एकच काम आहे. देशात द्वेष पसरवणे, मतांचे ध्रुविकरण करणे व मुस्लिमांना कोणत्याही पद्धतीने शिवीगाळ करणे. यांच्याकडे विकासाचा एकही मुद्दा नाही. यांना विकासासंदर्भात प्रश्न विचारला तर त्यांना उत्तर देता येणार नाही.
महाराष्ट्रात एवढे शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांना पॅकेज केव्हा देणार? सरकारला प्रश्न विचारा. त्यांच्याकडे उत्तर नाही. महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढला. त्यावरही त्यांच्याकडे उ्ततर नाही. ठेकेदारांवर कोणतीही कारवाई होत नाही. यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्त नाही. केवळ एकच गोष्ट ध्रुविकरण. मुंबईचा महापौर. जिसको मुंबई में रहना है, ये कहना है. अरे काय मुंबई कुणाच्या बापाची जहागीर आहे का? मुंबई सोडा म्हणणारे तुम्ही कोण? असा खडा सवाल वारीस पठाण यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.
ठाकरे गट – एमआयएमची छुपी युती – भाजप
दुसरीकडे, भाजपने वारीस पठाण यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देत ठाकरे गट व एमआयएमची छुपी युती झाल्याचा आरोप केला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, उबाठा एमआयएम छुपी युती? मुंबई महापालिकेत पठाण, खान, कुरेशी, शेख, अन्सारी किंवा एखादी हिजाबधारी महिला महापौर होऊ शकते, हा सूर अचानक उमटलेला नाही. तो उबाठा गटाच्या नव्या, दिशाहीन राजकारणातूनच जन्माला आला आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि एमआयएमसारख्या पक्षांमध्ये छुपी मोर्चेबांधणी सुरू आहे का, याकडे मतदारांनी अत्यंत सावधपणे पाहणे गरजेचे आहे. ही हातमिळवणी काल-परवा झाली नाही, तर तीन वर्षांपूर्वीच तिची पायाभरणी झाली होती का? 2022 च्या राज्यसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेला एमआयएमने दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणूनच आज महापौरपदाचे गाजर पुढे केले जात नाही ना? या प्रश्नांची स्पष्ट, थेट आणि निर्भीड उत्तरे उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली पाहिजेत.
मराठी माणसाच्या नावावर मते मागायची, भावनांचे राजकारण करायचे आणि सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीवर मात्र बिगरमराठी परप्रांतीयांना बसवायचे—हेच ठाकरेंचे खरे राजकारण आहे, हे मुंबईकरांनी विसरू नये. मराठी माणसा, तुझ्या नावावर सत्ता मिळवून तुझ्याच पाठीत खंजीर खुपसण्याचा हा कट ओळख. वेळीच सावध राहा, कारण आज मौन म्हणजे उद्याचा पश्चात्ताप ठरू शकतो, असे ते म्हणालेत.
