![]()
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने आपली रणनीती स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. “वंचित बहुजन आघाडीसोबत आमची सकारात्मक चर्चा सुरू असून २८ स्थानिक पातळीवर दोन्ही संघटनांचे नेते संवाद साधत आहेत. मात्र, ‘मनसे’सोबत चर्चा करण्याचा प्रश्नच
.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाच्या बैठक आज मुंबईत पार पडली. पहिल्या सत्रात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला महापालिकांचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ माध्यमांशी बोलत होते.
‘वंचित’सोबत युतीसाठी सकारात्मक पाऊल
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याबाबत सपकाळ म्हणाले की, “मुंबईत वंचित आणि काँग्रेसने एकत्र यावे, अशी अनेकांची इच्छा आहे. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही सर्व निर्णय जिल्हा स्तरावर सोपवले होते, त्याचप्रमाणे आताही २८ ठिकाणी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये युतीबाबत चर्चा सुरू आहे.” प्रकाश आंबेडकरांच्या ‘काँग्रेस युती करत नाही’ या आरोपावर बोलताना, हा ‘नरेटिव्ह’चा गुंता सुटला पाहिजे आणि दोन्ही बाजूंनी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सूत्र
सपकाळ यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना (ठाकरे गट) सोबत चर्चा सुरू असून त्याबाबतच्या सूचना संघटनेला आधीच देण्यात आल्या आहेत. ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या व्यतिरिक्त सध्या कोणाचाही प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला नाही. जर कोणाचा नवीन प्रस्ताव आला, तर त्यावर विचार केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले.
युती-आघाडीचा स्थानिक नेतृत्वाकडे अधिकार
नगरपालिका निवडणुकीच्या अनुभवावरून काँग्रेसने आगामी महापालिकांसाठी देखील ‘स्थानिक पातळीवर अधिकार’ देण्याचे धोरण अवलंबले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि तेथील राजकीय समीकरणे पाहूनच अंतिम निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील बदलत्या समीकरणांवर भाष्य करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत काँग्रेस कधीही जाणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा काँग्रेस करणार नाही, असे सपकाळ म्हणालेत.
