प्रहार'ची स्मार्ट मीटरविरोधात निदर्शने:विद्युत भवनवर धडक; अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर, मोहीम थांबवण्याची मागणी




अमरावती येथे महावितरणच्या स्मार्ट मीटरविरोधात ‘प्रहार’ संघटनेने गुरुवारी तीव्र निदर्शने केली. स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवून जुने मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कॅम्प येथील विद्युत भवनसमोर हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या मते, महावितरण कंपनीकडून घराघरांत बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पूर्वी कमी रकमेची वीजबिले येत असताना, स्मार्ट मीटरनंतर अनेकांना वाढीव बिलांचा सामना करावा लागत असल्याचा ‘प्रहार’चा दावा आहे. या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार सामाजिक संघटनेचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, महानगरप्रमुख बंटी रामटेके, हॉकर्स युनियनचे गणेश मारोटकर आणि कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरव ठाकरे यांनी केले. आंदोलनाच्या शेवटी अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांना निवेदन सादर करण्यात आले आणि विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. निवेदनात, अल्प उत्पन्न असलेल्या कामगार व शेतकरी वर्गावर स्मार्ट मीटरमुळे अन्याय होत असल्याचे नमूद करण्यात आले. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी भूमिकाही संघटनेने मांडली. मागण्या मान्य न झाल्यास कामगार व शेतकरी मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला. आंदोलनात प्रहार सामाजिक संघटनेचे विशाल दंडगव्हाळ, संपर्कप्रमुख गोलू पाटील, जिल्हा महासचिव शेख अकबर, संघटक श्याम इंगळे, कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष देवाशीष मते, सुरक्षा रक्षक युनियनचे शुभम झळके, सचिव विनय जायले, उपाध्यक्ष जय हिवरकर यांच्यासह समीर तायडे, विशाल आघडे, प्रकाश देशमुख, मुकेश घुंडायाल, शेषराव धुळे, विक्रम जाधव, अर्जुन आखेकर, रितेश पुरी, राहुल गाखरे, मोहन सदाफळे, विलास इंगळे, दीपक लोखंडे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *