![]()
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी हा निर्णय बदलून परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक ऑफलाईन (ओएमआर) पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे. कॅम्प रस्त्यावर एकत्र येत शेकडो विद्यार्थ्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला आणि तेथे निदर्शने केली. आंदोलनाच्या शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना संगणकाधारित परीक्षा पद्धतीमुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. अनेक विद्यार्थ्यांकडे संगणक हाताळण्याचा पुरेसा अनुभव नाही. ग्रामीण भागात इंटरनेटचा संथ वेग, तांत्रिक बिघाड आणि वीज पुरवठ्याची समस्या यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. शिवाय, गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभरातील विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेचा सराव करत आहेत. अचानक परीक्षा पद्धतीत बदल केल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि ‘समान संधी’च्या तत्त्वावर विपरीत परिणाम होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एमपीएससीचा हा नवा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर तातडीने व सहानुभूतीपूर्वक विचार करावा. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पूर्व परीक्षा पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच आयोजित केली जावी, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. निवेदनावर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, शासनाने यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढेल, अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. अमरावती शहरात स्पर्धा परीक्षा तयारीचे मोठे जाळे असल्याने या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. या आंदोलनात सुयोग राजनकर, पंकज बैस, भारत खातकर, आदित्य मिसाळ, स्नेहा चौधरी, प्राची बावनेर, गायत्री जाधव, यशस्वी माटे, भूमी टोंगे, पायल खंडेलवाल, ओम इंगळे, गौरी इंगळे, अर्पीता मेहरे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी:अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शासनाला निवेदन सादर
