![]()
पुणे येथे आयोजित रोटरी मराठी साहित्य संमेलनात ‘डावे की उजवे (विचारांच्या चक्रव्यूहातील आम्ही)’ या विषयावर परिसंवाद पार पडला. यावेळी, देशाच्या विकासासाठी समन्वयाची आणि विवेकवादी भूमिका महत्त्वाची असल्याचे मत वक्त्यांनी मांडले. भारताचे राष्ट्र म्हणून व
.
हा परिसंवाद रविवारी पार पडला. यामध्ये माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, लेखक अभिजीत जोग, ॲड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी आणि स्त्रीवादी लेखिका-कार्यकर्त्या गीताली वि. म. यांनी वक्ते म्हणून आपले विचार मांडले. ज्येष्ठ लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी या परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवले.
डॉ. विश्वंभर चौधरी यांनी ‘उजवे-डावे’ या संज्ञांपासूनच वैचारिक चक्रव्यूहांची सुरुवात होते, असे मत व्यक्त केले. संविधानवादी-मनुवादी, गांधीवादी-गोडसेवादी, नेहरूवादी-मोदीवादी असे अनेक चक्रव्यूह समाजात असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रपित्याला गोळ्या घालणारे राष्ट्रवाद शिकवत आहेत, याला त्यांनी ‘भंपकपणा’ म्हटले. चौधरी यांनी उपहासाने या सर्वांना ‘२०१४ ची देशभक्त बॅच’ असे संबोधले. समाजाला विज्ञानच विकासाच्या वाटेवर नेईल, धर्म, मंदिरे किंवा प्रार्थना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. असीम सरोदे यांनी तंत्रज्ञान आणि विज्ञानमार्गाने जाणारा विचारच पुरोगामी असल्याचे प्रतिपादन केले. प्रश्नांची नसबंदी न करता प्रश्न विचारण्याची मोकळीक असणे हे पुरोगामीपणाचे लक्षण आहे. सुधारणा, विकास आणि सकारात्मकता ही पुरोगामी मूल्ये आहेत, तर अंधश्रद्धा, इतिहास, भूतकाळ आणि परंपरावाद हे समाजाला मागे ढकलणारे घटक आहेत. धर्म व्यक्तिगत असावा आणि घराबाहेर केवळ माणूसपण असावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या आपण ट्रेडमिलवर धावणाऱ्यांसारखे झालो आहोत, पुढे जात असल्याचा आभास होत असला तरी प्रत्यक्षात आपण तिथेच आहोत, असे ते म्हणाले. उंच मंदिरे उभारताना माणसे खुजी होत आहेत, यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. आपली ओळख बुद्धीच्या जोरावर असावी, धर्म-जातीवर नको, असे सांगत मानवी प्रतिष्ठा सर्वोच्च असावी आणि स्वातंत्र्याचे वर्तुळ विस्तारत जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अभिजीत जोग यांनी डाव्या विचारसरणीवर टीका केली. संघर्ष शोधायचे, नसले तर निर्माण करायचे आणि लोकांना झुंजवत ठेवायचे, असे अराजकाकडे नेणारे अविचारी मार्ग तथाकथित डाव्यांनी स्वीकारले आहेत, असे ते म्हणाले. मानवी सभ्यता नष्ट करून नव्या समाजाची आणि नव्या व्यवस्थेची निर्मिती डाव्यांना अपेक्षित आहे. त्यासाठी कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम आणि खासगी मालमत्ता यांचे आधार नष्ट केले पाहिजेत, अशी त्यांची मानसिकता आहे. ज्यातून हे आधार आले, तो इतिहास आणि ती संस्कृती मुळापासून नष्ट करण्याची ही मानसिकता असल्याचे जोग यांनी सांगितले. डाव्यांना जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्यांनी काहीही नवनिर्माण केले नाही, हा इतिहास आहे, असा टोलाही जोग यांनी लगावला.
