आंबेडकरी साहित्य चळवळीच्या मुशीतून आपल्या साहित्यिक जीवनाचा प्रवास करणारे प्रज्ञाधर ढवळे
यांचा ५ एप्रिल हा जन्मदिवस असला तरी गंगाधर पासून प्रज्ञाधर होण्याची प्रक्रिया काही औरच आहे. सुप्रसिद्ध लेखक तथा विचारवंत यशवंत मनोहर यांनी त्यांचे नामकरण केले आहे. याला ते माझा नवा जन्म होत आहे ची अनुभूती असल्याचे ते सांगतात. ढवळे सर हे पेशाने प्राथमिक शिक्षक. परंतु प्राथमिक शिक्षक ते प्रयोगशील मुख्याध्यापक आणि कवी ते जेष्ठ समीक्षक इथपर्यंतचा यशस्वी प्रवास करताना अनेक लहान -मोठ्या अडथळ्यांची ‘ शर्यत ‘ जिंकत … आज नामवंत ‘विद्रोही साहित्याचा बुलंद आवाज ‘ म्हणून साहित्य विश्वात त्यांची अल्पावधीत ख्याती निर्माण झाली आहे. केवळ शब्दांचा ‘भुलभुलैया ‘ मला पसंत नाही ; प्रत्यक्ष मैदान गाजवणारे साहित्यिकांची फौज निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे ते प्रतिपादन करतात . अनेक अग्रगण्य वर्तमानपत्रांतून त्यांचे प्रासंगिक लेखन , आकाशवाणी वरून प्रसारित झालेली प्रासंगिक भाषणे , मुलाखती , काव्यवाचनातून परिवर्तनवादी विचार पेरण्याचे कार्य सातत्याने करत आहेत . त्यांचे सामाजिक संघटनांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध कृतीशील विचारधारेला खतपाणी घालण्यास मदत ठरते . त्यांची समाजाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा अत्यंत प्रामाणिक आहे . केवळ चळवळ सांगून गप्प बसणारा साहित्यिक नसून ; प्रत्यक्ष चळवळ ‘जगणारा ‘ जिंदादिल अवलिया म्हणून ‘ प्रज्ञाधर ढवळे’ जगावेगळे साहित्यिक आहेत हे विशेष !
साहित्याच्या प्रांतात अनेकानेक प्रयोगशील वृत्तीने नवोपक्रम राबवून नवोदित साहित्यिकांना हक्काचे विचार मंच निर्माण करून त्यांचा यथोचित मानसन्मान जपणारं नेतृत्व म्हणून प्रज्ञाधर ढवळे यांचे नाव हल्ली आघाडीवर आहे . अनेक बांडगूळ साहित्यिक उगम पावतात ; एखाद्या प्रस्थापितांच्या बोटाला धरून चंचूप्रवेश करून कधी नामशेष होतात त्यांचा पत्ता स्वतः त्यांना देखिल लागत नाही . ‘साहित्याच्या महाप्रवाहात टिकणे …येऱ्या गबाळ्याचे काम नाही ‘ हे ढवळे सरांनी प्रस्थापितांना दाखवून दिले आहे . साहित्यसेवेच्या गोंडस नावाखाली ‘मेवा’ जमा करण्याच्या अपवृत्ती वाढत असताना पारदर्शक पद्धतीने सातत्याने कोणाचा एक रुपया न घेता होणारी काव्यपौर्णिमेचे शतकपूर्ती भव्यदिव्य समारंभ हा साहित्य क्षेत्रात नवा ‘मापदंड ‘ निर्माण करणारा आहे . त्यांची झेप साहित्य विश्वात निश्चितच नवोदितांना नवप्रेरणा देणारी आहे . समाजाप्रति गौरवास्पद आणि कौतुकास्पद आहे .
साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांची ‘पंढरी ‘ असते हे ओळखून उपेक्षित , वंचित साहित्यिकांची मोठ बांधून त्यांना हक्काचे ‘ जन संवाद ‘ पंढरी निर्माण करण्याचे श्रेय त्यांनाच जाते . या हक्काच्या पंढरीत गेल्या चार वर्षात पाच संमेलनांचे नेत्रदीपक यशस्वी नियोजन करून प्रस्थापित साहित्यिकांच्या बुरुजाखाली सुरुंग पेरण्याचे धाडसी काम ढवळे सरांच्या नेतृत्वाखालीच झाले असल्याने माघारी हलक्यावरी घेणारे आज प्रस्थापित स्वयंघोषित विचारवंत ढवळे यांची आज पाठीमागे सुद्धा आदराने ‘पाठराखण ‘ करतात हे काय कमी आहे काय ? वर्षभर पायाला भिंगरी बांधून पठठया महाराष्ट्र पादाक्रांत करतो . आंबेडकरी विचारांच्या सौंदर्यदृष्टिचे नव्याने ‘बीजारोपण ‘ करणारी समांतर यंत्रणा कशी असावी ? याचा वस्तूपाठ सरांनी आपल्या वाणीतू आणि प्रयोगशील कृतीतून दाखवून दिले आहे .
मुख्याध्यापक म्हणून देखील शाळेत अनेक कृतीशील आणि प्रयोगशील असे अभिनव नवोपक्रम शाळा स्तरावर राबवून चिमुकल्यांना क्षितिजापलिकडे पाहण्याची नवदृष्टी प्रदान करणारी यंत्रणा राबवून वैज्ञानिक दृष्टीकोन विकसिकत करणेकरिता अनेक पायलट प्रोजेक्ट राबवले आहेत हे त्यांच्या कल्पक सौंदर्यदृष्टीचे उदाहरण देता येईल . तरंग वाचनालय , खुले वाचनालय , निसर्ग भ्रमंती , कोराना काळात अख्ख्या गावाच्या भिंत्या बोलक्या आणि स्वाध्याय फळे तयार करून विद्यार्थी कोरोना काळात सुद्धा अभ्यासू आणि जिज्ञासू कसा राहील ? याकडे कटाक्षाणे लक्ष दिले . प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या – पुण्यतिथ्या आणि कर्तबगार इतिहास घडवणाऱ्या महिलांच्या इतिहासाला उजळणी देणारे उपक्रम राबवून खराखुरा इतिहास खऱ्या अर्थाने शेवटच्या बाकावरील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे अखंड ज्ञानयज्ञाचे कार्य त्यांच्या हातून नित्य नियमाने चालूच आहे . मुख्याध्यापक म्हणून आदर्श आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांचे कार्य अनुकरणीय आणि प्रशंसनीय आहे . ते कधीही कोणत्याही आदर्श शिक्षकाच्या पुरस्काराच्या पाठीमले लागले नाहीत हे विशेष ! कारण त्यांचे शैक्षणिक , वाङयीन, सामाजिक , सांस्कृतिक , क्रीडा विश्वातील कार्य कोणत्याही शासकीय पुरस्कारांची मापदंड ओलांडणारी आहेत परंतु त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने इतरांचे फावले आहे . ते कधीही गर्व , अहंपणा , द्वेश , हेवा , मत्सर इत्यादी दुर्गूनावर मात केली आहे . स्वतःचा मुलगा अधिकारी व्हावा म्हणून झटणारे अनेक आहेत परंतु माझा विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे ही उदात्त भावना उराशी बाळगून धडपणारं ‘ व्यक्तिमत्व ‘ म्हणून त्यांची ख्याती आहे .
प्रज्ञाधर ढवळे सर यांना प्रख्यात साहित्यिक तथा आंबेडकरी साहित्याचे भाष्यकार आदरणीय यशवंत मनोहर सर यांनी त्यांचा ‘ प्रज्ञाधर ‘ असे नामकरण करून आपल्या प्रज्ञेचा समाजाप्रति योग्य उपयोग करावा असा संदेश त्यांना दिला आहे . त्यामुळे ढवळे सरांच्या साहित्य कृतित मनोहर सरांचा प्रभाव जाणवतो . नव्हें ती ‘मोहर ‘ ढवळे सर सजग राहून अधिक जबादारीतून आपल्या कृतीतून उमटवतात ! त्यांचे शब्दसौंदर्य हे इतके विलोभनीय आणि साहित्याच्या प्रांतात ‘तहेलका ‘ मचवणारे आहे . त्यांच्या कविता पद्मश्री नामदेव ढसाळांच्या पठडीतील .. त्यांच्या पाऊलखूणा ताज्या करणाऱ्या आहेत . भय कविता , रहस्य कविता , गुढ अलक प्रकार , समीक्षण इत्यादी अवघड प्रकार ते लिलया हाताळतात हे उल्लेखनिय आहे. साहित्य , समाजसेवा आणि शिक्षण या त्रिवेणी क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटणाऱ्या ढवळे सरांनी आपले हक्काचे शिक्षण क्षेत्र तर आपल्या अजब – गजब प्रयोगांनी , कृतिशील नवोपक्रमांनी अक्षरशः ‘ ढवळून ‘ काढले म्हणटल्यास वावगे ठरू नये … ! अशा विद्रोही विचारवंताला दीर्घायुष्याच्या लाख -लाख मंगलमय सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद!
– मारोती भु .कदम
मो .9049025351
(लेखक प्रयोगशील मुख्याध्यापक व शैक्षणिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत .)
Post Views: 30
