![]()
मागील वर्षी प्रचंड पाऊस पडला, पीक हातात येण्यापुर्वीच शेताच सडले. जे हाती आले ते कवडीमोल भावात विकल्या गेले. अश्या परिस्थितीत कर्जमाफी पाहिजेच होती, सोबतच भरीव नुकसान भरपाई, विमा देखील शेतकऱ्यांना मिळणे अपक्षित होते. मात्र तसे झाले नाही. आजही अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या मदतीपासून वंचित आहेत. अजूनही कर्जमाफी झाली नाही. दरम्यान शेतकरी कर्जमाफीची आठवण करुन देण्यासाठीच गुरूकुंज मोझरी येथे प्रहारच्या ५५ पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह, शेतकरी, जवान यांनी शनिवारी २७ फेब्रुवारीला पत्र लिहून स्वत:च्या रक्ताने सह्या केलेले पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. ओला दुष्काळ पडूनही कर्जमाफी झाली नाही. त्यामुळेच प्रहारचे बच्चू कडू यांनी रायगडपासून नागपूरपर्यंत विविध सामाजिक व आक्रमक आंदोलन करून सरकारला कर्ज माफीबद्दल सकारात्मक बोलायला भाग पाडले. कर्जमाफी करणार हे जाहीर केल्यानंतरही कर्जमाफीत अनेक अटी लावण्यात येईल, असे शेतकऱ्यांना वाटायला लागले. म्हणूनच आठवण कर्जमाफीची हे पदयात्रेच्या माध्यमातून बच्चू कडू यांचे शांततामय आंदोलन एक मार्चपासून सुरू होत आहे. त्याच अनुषंगाने तिवसा प्रहारच्यावतीने रक्ताव्दारे लिहिलेले पत्र मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहे. मोझरी येथे शनिवारी रक्तदान करण्यात आले. त्याच रक्ताने पत्रावर स्वाक्षऱ्या करून मुख्यमत्र्यांना आठवण करून देण्यात आली. या आंदोलनात ५५ शेतकऱ्यांच्या मुलांनी तसेच भारतीय सीमेवर तैनात असलेले श्रीकांत प्रधान यांनी रक्तदान केले व रक्ताव्दारे सह्या करण्यात आल्या. यावेळी संजय देशमुख, योगेश लोखंडे, सुरेंद्र भिवगडे, कपिल उमप, निलेश राऊत, प्रशांत राऊत, अंकुश राऊत, योगेश भुसारी, विशाल ठाकूर अजय चौधरी, समिर लांडगे, बंडू मोने, सुधीर चौधरी, दिनेश ठाकरेयांच्यासह अन्य शेतकरी व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्जमाफीची आठवण; रक्ताने सह्या करुन सीएमना पाठवले पत्र:गुरूकुंज मोझरी येथे‘प्रहार’तर्फे आंदोलन
