केशरबाई लाहोटी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा:मराठी भाषेचे संवर्धन ही काळाची गरज – प्रा. नितीन घायवट

0
db-temp-cover-marathi-57_1772295823.jpg




श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. नितीन घायवट उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी डॉ. के. के. गाडबैल यांनी स्थान भूषविले. प्रा. डॉ. दीपावली राऊत, प्रा. प्रमोद ढोले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. प्रमोद ढोले यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य आणि कार्यक्रमाच्या हेतूची माहिती दिली. प्रमुख वक्ते प्रा. नितीन घायवट यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मराठी भाषेचा खरा गौरव तेव्हाच होईल जेव्हा दैनंदिन व्यवहार आणि प्रशासकीय कामकाज मराठीतूनच होईल. मोल्सवर्थ शब्दकोशानंतर दाते-कर्वे शब्दकोशात वाढलेली शब्दसंख्या पुढे शासकीय कोशात कमी झाल्याचे उदाहरण देत त्यांनी भाषासमृद्धीबाबत चिंता व्यक्त केली. मराठी भाषिकांनी भाषाभान जपणे आणि भाषेचा सक्रिय वापर करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा धावता आढावा घेत त्यांनी सांगितले की, कुसुमाग्रजांनी कवी, नाटककार, समीक्षक, कादंबरीकार अशा विविध क्षेत्रांत मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाला मराठी कवितेचा मानबिंदू असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘भाषा वापरली तरच टिकेल’ मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. दीपावली राऊत यांनी सांगितले की, भाषा गौरव दिन साजरा करणे अभिमानाची गोष्ट असली तरी दैनंदिन संवादात मराठीचा किती वापर होतो, याचा आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे. एक दिवसाचा गौरव करण्यापेक्षा भाषा जपणे, बोलणे, शिकणे आणि संवाद साधणे अधिक महत्त्वाचे आहे. विविध शास्त्रांमध्ये मराठी शब्दांची रूजवात करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढवावी, असे त्यांनी आवाहन केले. प्रत्येकाने दर महिन्याला किमान दोन पुस्तके वाचण्याचा संकल्प करावा, अशी सूचना त्यांनी केली. ‘मराठी ही संस्कृतीची ओळख’ अध्यक्षीय भाषणात डॉ. के. के. गाडबैल म्हणाले की, मराठी ही केवळ भाषा नसून ती संस्कृतीची ओळख आहे. धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांत मराठीचे योगदान अनन्यसाधारण आहे. कुसुमाग्रजांनी मराठीला ज्ञानभाषा बनविण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ शासनाने २१ जानेवारी २०१३ रोजी त्यांच्या जयंतीचा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या मोहोड हिने केले, तर आभार प्रदर्शन मो. अयान पटेल यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भाषाप्रेम आणि वाचनसंस्कृती जोपासण्याचा संदेश देण्यात आला.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks